Sanjay Raut on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सहमती दर्शवली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला. १७ सप्टेंबरनंतर देशाच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करू शकणार नाहीत, हे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सांगत आहेत. आगामी काळात त्यांना पद सोडावे लागू शकते, असे खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, १७ सप्टेंबरनंतर या सर्व गोष्टींचा उलगडा जनतेसमोर होईल.
१७ सप्टेंबर हा पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असून पंतप्रधान म्हणून त्यांचा हा शेवटचा वाढदिवस ठरेल, असे राऊत म्हणाले. तसेच नरेंद्र मोदींनंतर अमित शाह हे देखील पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत त्यांनी वर्तवले. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि आमच्यासमोर येत असलेली तथ्ये याच्या आधारेच आपण हे विधान करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टशी संबंधित दान प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना मिळालेल्या क्लीनचिटवरही राऊत यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. या निर्णयावर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, क्लीनचिट मिळाली तरी या विरोधातील आंदोलन थांबणार नाही. या मुद्द्यावर मोरगाव येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाचे कौतुक केले. न्यायालयात पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यात आली असून शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचेच आहे, हे युक्तिवादातून स्पष्ट झाले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.