
जल जीवन मिशनमधील थकीत बिलांमुळे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
ही आत्महत्या नसून सरकारनेच त्यांचा खून केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
विरोधकांनी सरकारवर अपयशाचा ठपका ठेवत तीव्र टीका केली आहे.
या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जल जीवन मिशन योजनेतील तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडालीय. बिल पास होत नसल्यानं आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. सरकारने कंत्राटदर हर्षल पाटील यांचा खून केला,असा घणाघात आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. दरम्यान हर्षल पाटील या टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण समोर आले आहेत.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय कंत्राटदाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. एक कोटी ४० लाख रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
2020 सालामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात हर्षल पाटील याने जलजीवन मिशन योजनेचे सब कॉन्ट्रॅक्ट मिळवले.
सुरुवातीला हर्षल याने आपल्या तांदूळवाडी गावासह अहिरवाडी, कन्हेगाव आणि मालेवाडी गावाच्या 2 कोटींची कामे घेतली.
ज्यापैकी तांदूळवाडी गावात जल जीवन मिशन योजनेच्या एक कोटी 75 लाखांचे काम होते. जिल्ह्यामध्ये सर्वात उशिरा काम सुरू करून मुदतीच्या आत काम पूर्ण करून शासनाला हस्तांतर देखील केलं.
गावचेच काम असल्याने ते लवकर पूर्ण करावं आणि काम रखडू नये, आपल्या नावावर कोणताही बट्टा लागू नये म्हणून हर्षलने आपली 20 गुंठे शेतजमीन विकली आणि घरातलं सोन्याचे दागिने देखील विकले.
2022 पर्यंत हर्षल पाटील यांनी त्याच्याकडची असणारी जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण केली होती.
महायुती सरकार आल्यानंतर हर्षल याचं बिल थकीत गेलं. बिल मिळवण्यासाठी हर्षल याने पाठपुरावा सुरू केला.
वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याकडे देखील थकित बिलाच्या मागणीचा प्रश्न हर्षल याने उपस्थित केला होता. हर्षल पाटील याच्या प्रश्नावरून आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आत्महत्या प्रमाणे राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्या होतील अशी भीती व्यक्त केलीय.
दरम्यान कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी धक्कादायक आरोप केलाय. बिले वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासाला कंटाळून हर्षलने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हात उसने आणि सावकारांकडून घेतलेले पैसे यांची परतफेड कशी करायची आणि बिल मिळत नसल्याने हर्षलने आत्महत्या केली असा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्षांनी केलाय.
जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांची देयके न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे. मात्र त्या अनुषंगाने खुलासा केला करण्यात आला आहे. हर्षल अशोक पाटील यांनी जिल्हा परिषद सांगली कडील जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा करारनामा केलेला नाही.
त्यामुळे त्यांची जल जीवन मिशन अंतर्गत देयक प्रलंबित असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच जिल्हा परिपद सांगलीच्या उपलब्ध अभिलेखानुसार सदर व्यक्ती ही कंत्राटदार म्हणून नोंदित असल्याचे दिसून यत नाही. असे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद खुलासा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.