
सांगलीमध्ये युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. जल जीवन मिशन योजनेचे काम करूनही तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्यामुळे हर्षल पाटील यांनी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. या कंत्राटदाराच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत धक्कादायक दावा केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवर स्पष्टीकरण दिताना सांगितले की, 'जो आरोप केला जात आहे की हर्षल पाटील यांच्या जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे थकले होते त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. मी स्वतः याविषयी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्यासोबत आणि कार्यकारी अभियंत्याशी बोललो आहे. हर्षलला कोणतेही काम जिल्हा परिषदेकडून दिले नव्हते. कोणतेही बिल पेंडिंग नाहीत. जर त्यांनी सबलेट काम घेतले असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही.'
गुलाबराव पाटील यांनी पुढे असेही सांगितले की, 'हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही कामं नाहीत. जल जीवन मिशन योजनेवर कुठलीही बिलं प्रलंबित नाहीत. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेली असावीत. मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे कुठलीही नोंद नाही.' सध्या हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्वीट करत सरकारवर टीका केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले.'
तसंच, 'आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे. एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा.', असे जयंत पाटील म्हणाले.
हर्षल पाटील यांनी आत्महत्या का केली?
जल जीवन मिशनच्या थकीत बिलामुळे मानसिक तणावात येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य काय आहे?
त्यांनी सांगितले की, हर्षल पाटील यांना जिल्हा परिषदेकडून कोणतेही काम देण्यात आले नव्हते आणि त्यांचे कोणतेही बिल थकित नव्हते.
विरोधकांचे सरकारवर आरोप काय आहेत?
जयंत पाटील यांनी सरकारवर रोजगाराच्या खोट्या आश्वासनांचा आरोप करत आत्महत्येला सरकार जबाबदार धरले आहे.
हर्षल पाटील यांचे सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम होते का?
मंत्री म्हणतात त्यांच्याकडे याबाबत माहिती नाही, पण बिल थकले असल्याचा आरोप तथ्यहीन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.