

‘ते पन्नास दिवस’ कादंबरी अभ्यासक्रमातून हटवल्याने वाद
कादंबरी ‘सरकारविरोधी’ असल्याचा दावा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह
अमर घटारे, साम प्रतिनिधी
'ते पन्नास दिवस'कादंबरीला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवल्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीए मराठी'च्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ते पन्नास दिवस कादंबरीचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता अमरावती विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवली आहे. ही कादंबरी 'केंद्र सरकारविरोधी'असल्याचं म्हणत विद्यापीठाने कादंबरीला अभ्यासक्रमातून हटवलंय.
यावरून नवीन वाद सुरू झाला असून सरकारवर टीका केली जातेय. देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. लेखक, कलावंतांची मुस्कटदाबी केली जात आहे, लेखकांच्या लिखाणावर अंकुश ठेवला जातोय, असा आरोप सरकारवर केला जात आहे. दरम्यान काँग्रेससह पुरोगामी विचारवंतांनी ही कादंबरी अभ्यासक्रमात ठेवावी, अशी मागणी करत आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, या कादंबरीमध्ये नेमकं असं काय आहे, जे सरकारला आवडत नाहीये किंवा सरकारविरोधात आहे.
ही कादंबरी पवन भगत यांनी लिहिली आहे. 'मैत्री पब्लिकेशन'ने ती प्रकाशित केली आहे. ही कादंबरी १६८ पानांची आहे. अनेक वाचकांना ही कादंबरी आवडली आहे. एका ई-कॉमर्स साइटवर अनेक वाचकांनी या कादंबरीला ५ स्टार दिले आहे. अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'ते पन्नास दिवस' ही कादंबरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमातून हटवली याची माहिती लेखक पवन भगत यांना वृत्तपत्रातून मिळाली. कादंबरी अभ्यासक्रमात लावण्यासाठी मी कोणत्याही विद्यापीठाला भेट दिली नाही. कोणत्याही कुलगुरूंना भेटलो नाही, किंवा अर्ज केला नाही. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कादंबरीचा समावेश झाला तरच विद्यापीठाकडून माहिती मिळते. त्याआधी कोणताही पत्रव्यवहार करत नाहीत. दरम्यान ते पन्नास दिवस ही कादंबरी मुंबई विद्यापीठात 'एमए'ला तसेच अहमदनगरमधील 'न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज (स्वायत्त)'मध्ये 'बीए सेकंड'लाही म्हणजे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कादंबरी हटवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अयोग्य आहे. या निर्णयावरून देशात अघोषित आणीबाणी लागू आहे. लेखक आणि कलावंतांसाठी हा काळ अनुकूल नाहीये. लेखण आणि कलेचं स्वातंत्र आबाधित राहिले पाहिजे. यावर कोणत्याही सरकारचं अंकुश असून नये. लेखक म्हणून मला भीती वाटतेय. माझा परिवार चिंतेत आहे. आम्ही दहशतीत आहोत.
ही कादंबरी 'भाजप सरकारविरोधी' असल्याचा आक्षेप घेतल्याने ती अभ्यासक्रमातून हटवल्याचा आरोप केला जात आहे.कोरोना काळावर आधारित ही कादंबरी सरकारच्या विरोधात भाष्य करते, असं सांगत काही भाजपसमर्थक प्राध्यापकांनी ती हटवण्यासाठी प्रयत्न केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे. ही कादंबरी लागू करावी अशी सर्व स्तरावरून मागणी झाली होती. या कादंबरीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर ती अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. या कादंबरीमध्ये कोरोना काळात सरकारने जो लॉकडाऊन लावला होता.त्यावेळी अनेक मजुरांना काम सोडून आपल्या घरी जावे लागले होते, त्यावेळी त्यांना आलेल्या समस्यांचा आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीचे वर्णन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.