
संजय सूर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी
Raju Shetti on Shaktipeeth Expressway : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न, महायुती सरकारने न दिलेल्या आश्वासनांमुळे वाढलेली निराशा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था यावरून राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे 27 हजार हेक्टर जमीन बाधित होणार आहे. यामुळे सुमारे 55 हजार शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरण्याची भीती आहे. "या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांची जमीन वाचावी, यासाठी मी राज्यभर फिरतोय," असे राजू शेट्टी यांनी सांगितले. सरकारने या प्रकल्पाच्या परिणामांचा सखोल विचार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि पर्याय द्यावेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
महायुतीच्या आश्वासनांचा भंग
महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आणि केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेला 20 टक्के अनुदान देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. मात्र, आता सरकारने या आश्वासनांवर घुमजाव केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. "शेतकऱ्यांना गंडवून त्यांची मते घेतली, पण आता शब्द पाळायला सरकार तयार नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न शेतमजुरांपेक्षाही कमी झाले आहे. "याची सरकारला लाज वाटली पाहिजे. याच कारणामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत," असे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी लढण्याची प्रेरणा घ्यावी, यासाठी आपण जनजागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संताप
राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. "आजकाल भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण तुम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचा विमा दिल्याचे सांगता," असे वक्तव्य करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. तसेच, "शेतकरी कर्जमाफी घेतो आणि ते पैसे साखरपुड्यावर उधळतो," असे बेछूट वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी का घेतला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली तेव्हाच त्यांना समज द्यायला हवी होती. आता शेतकरी त्यांना माफ करणार नाहीत," असे शेट्टी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.