
पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. 'यशदा' येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा केलीय. या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करा. तसेच एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी प्रयत्न करा. या अंतर्गत राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
उत्तम प्रशासनासाठी मनुष्यबळाचा विकास महत्त्वाचा असतो. त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचाही विचार करावा. उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा. इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुकरण करावे.
प्रशासकीय व्यवस्थेसाठी कार्यशाळेत ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्या महत्त्वाच्या ठरतील. अनुभवी अधिकाऱ्यांचे विविध प्रयोग इतरांना मार्गदर्शक ठरतील. ते अनुभव समजून घेतले तर प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
दरम्यान 'यशदा' येथे झालेल्या कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात यांनी कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.