

पिकनिकदरम्यान तिघांचा नदीत बुडून मृत्यू
नागपूरच्या कामठी तालुक्यातील महादेव घाटावर ही घटना घडली
मृतांमध्ये दोन तरुण आणि एका ६ वर्षीय मुलाचा समावेश
कन्हान नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली
नागपूरमध्ये ३ जणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. पिकनिकला गेले असता नदीमध्ये पोहणे त्यांच्या जिवावर बेतलं. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. नागपुरच्या कामठी तालुक्यातील महादेव घाटावर ते पिकनिकला गेले होते. त्यावेळी कन्हान नदीत पोहताना यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी आणि नागपूर येथील १२ ते १३ जण पिकनिकसाठी महादेव घाटावर गेले होते. कामठी कँटोन्मेंट परिसरातील महादेव घाट येथे कन्हान नदीमध्ये ते सर्वजण पोहण्यासाठी उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघे जण बुडाले. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
नदीकिनारी आनंदात वेळ घालवत असताना तिघे जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. उपस्थितांनी बचावासाठी प्रयत्न केले मात्र तिघांचाही जीव वाचवण्यात त्यांना यश आले नाही. मृतांमध्ये रोहित नागदेवे (३३ वर्षे) आणि गौतम अंबादे (३१ वर्षे) या दोन मित्रांचा समावेश आहे. तर या घटनेत ६ वर्षांच्या चैतन्य अंबादे याचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दुर्घटनेमुळे कामठी आणि जरीपटका परिसरात शोककळा पसरली. या घटनेनंतर नागरिकांनी नदी-नाल्यांजवळ पिकनिक करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.