

फलटण शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावर अभिनेते किरण मानेंची पोस्ट चर्चेत
अभिनेता किरण माने यांनी सरकारवर निशाणा साधला
त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहली
पोलिस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले
साताऱ्यातील फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून सर्वच जण या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. मराठमोळे अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट लिहिली असून सरकारवर निशाणा साधला आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'एका गरीब कुटुंबात जन्म झाला होता तिचा. शाळेत नक्की हुशार असणार. दरवर्षी मार्कलिस्ट बघून आईबापाचा ऊर अभिमानानं भरून येत असेल. ‘पोरीला लै शिकवायचं. तिला काय कमी पडू द्यायचं नाय.’ असं ठरवून रक्ताचं पाणी, जीवाचं रान केलं असंल दोघांनीही. पोरगीही कष्ट आणि अभ्यासात कमी पडली नसणार. जीव लावून शिकली आणि डॉक्टर झाली! आईबापाला आभाळ ठेंगणं झालं आसंल. अगदी परवा-परवा, "पोरी तुला दिवाळीला न्यायला येऊ का?" असा बापानं फोन केला होता. त्याला माहितीही नसेल की ही दिवाळी सगळ्या आनंदाची राखरांगोळी करणार आहे. दिवाळीतच बावीस-पंचवीस वर्षांच्या अविरत संघर्षाला सुरूंग लागला. विपरीत परिस्थितीतून आकाराला आणलेलं एक आयुष्य उद्ध्वस्त झालं. सगळ्या सुंदर स्वप्नांचा चुराडा झाला.'
किरण माने यांनी या प्रकरणावरून सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, 'दडपशाहीचा अतिरेक आणि बलात्कार झाल्यामुळे तिनं स्वतःला संपवलं. जाताजाता हे सगळं एका पोलिस अधिकाऱ्यानं केलं असल्याचं तिनं लिहून ठेवलं. एक माजी खासदार आणि पोलिस अधीक्षक सुद्धा याला जबाबदार असल्याचं तिनं जिव सोडण्याआधी लिहिलं. इतकं सोपं असतं हे पचवणं??? तिच्या आईबापासाठी नाही म्हणत मी... एक 'माणूस' म्हणून तुमच्या-माझ्यासाठी म्हणतोय."तिच्याजागी आपली बहीण, मुलगी असती तर.." वगैरे 'क्लीशे' कल्पना आहेत हो. त्या नकाच करू. एवढाच विचार करा की माझ्या अवतीभवती हे घडलं आहे. मी ज्या राज्यात राहतो त्या राज्यात… मी ज्या समाजात वावरतो त्या समाजात हा घृणास्पद प्रकार घडलाय. आणि तरीही सत्ताधाऱ्यांना कॉलर पकडून जाब विचारण्याची आज आपल्याला भीती वाटते! याचाच अर्थ मोगलाई-पेशवाईनंतर आपण पुन्हा एकदा अत्यंत नीच, हिंस्त्र, हिडिस आणि घृणास्पद काळात पाऊल ठेवले आहे.
आपण आला धर्म राजकारण्यांकडे गहाण ठेवला असल्याचे मत व्यक्त करत किरण माने म्हणाले की, 'एका गरीबाच्या लेकीच्या अब्रूसाठी आपल्या हाताखालच्या पाटलाचे हातपाय तोडणार्या या भुमीतल्या शिवशाहीचा अस्त झाला आहे. रोज जात आणि धर्मावरून 'सोयीनं' भावना वगैरे दुखावून घेऊन चिखलफेक करणारी प्रक्षोभक, रागीट मंडळी याबाबतीत मात्र चिडीचूप आहे ! त्यांनी ओळखावं की आपल्याच धर्मातली मुलगी विटंबली गेली असूनही आपण सत्ताधाऱ्यांविरोधात शब्दही काढणार नसू तर आपण या महान धर्माचं नांव घेण्याच्याही लायकीचे नाही आहोत. आपण आपला धर्म निर्लज्जपणे मुठभर राजकारण्यांकडे गहाण ठेवला आहे. सगळ्यात मोठे धर्मद्रोही आपणच आहोत. शेकडो वर्षांपुर्वी भव्यदिव्य, भक्कम चिरेबंदी असणार्या काही राजमहालांचं आपण भयाणभेसूर खंडहर झालेलं पहातो. पडलेल्या भिंती, मातीचे ढीग, गवत आणि घाणीचं साम्राज्य दिसतं. तशीच कोणे एके काळी समृद्ध, सुखी, समाधानी असलेल्या आपल्या महान देशाची अवस्था झाली आहे.
तसंच, 'सर्वसामान्य माणसाच्या संवेदनशीलतेवर रोज बलात्कार होतोय. माणुसकीनं आत्महत्या केलीय. ज्या भुमीला भीमरायासारख्या सिंहानं संविधानाची सुरक्षा दिली. गांधीसारख्या वाघानं सत्याची डरकाळी फोडायला शिकवलं... त्या भुमीवर आज अत्यंत फडतूस अशा उंदरं आणि घुशींचं साम्राज्य आहे. त्यांच्या पिलावळीनं थैमान माजवलंय. घाणेघाण करून ठेवलीय. संपुर्ण देश आपल्या डोळ्यांसमोर नासवला जात आहे. आपण मुर्दाडासारखे बघत बसलोय.', असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.