फैय्याज शेख
वाडा (पालघर) : आदिवासी भाग असलेल्या परिसरात आजही पुरेशा सुविधा झालेल्या नाहीत. प्रामुख्याने रस्ते झाले नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांची परवड थांबत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा संघर्ष थांबत नसून रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांना वैतरणा नदीतून तराफ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोट्यावधीचा निधी जातो कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायकर पाडा हे वीस घरांचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तराफ्याच्या सहाय्याने वैतरणा नदी पार करावी लागत आहे. सोनाळे गावात शाळा असल्याने वारा, पाऊस व नदीच्या पाण्यात ओले झालेले शाळेचा गणवेश वह्या, पुस्तकांची पार अवस्था होत असते. अशा परिस्थितीत डोक्यावर भितीची टांगती तलवार असतानाही हे विद्यार्थी जिद्दीने प्रवास करत शाळा गाठत असतात.
शाळेत जाण्यासाठी रोजच जीव धोक्यात
रायकर पाडा या गावातील १५ विद्यार्थी दररोज सोनाळे येथील हायस्कूलमध्ये जाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. यात २ विद्यार्थी जि. प. शाळा कापरी, एक विद्यार्थी वाडा कॉलेज अशा एकूण १८ विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. मात्र त्यासाठी पावसाळ्यात रुद्रावतार धारण करत असलेल्या वैतरणा नदी पार करावी लागत असते. नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असा धोकादायक प्रवास करावा लागतो.
गाऱ्हाणे मांडूनही उपयोग नाही
इतकेच नाही तर विद्यार्थ्यांबरोबरच गरोदर माता, आबाल वृद्ध, रुग्ण नागरिक यांचीही गैरसोय होत असते. त्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मुला बाळांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही कोणी दाद घेत नाही. त्यामुळे आम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागत असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.