

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. पाऊस नसतानाही तिबेटमधून आलेल्या पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरे, इमारती, पूल, टॉवर आणि अनेक गावं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. जनावरंही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मानसरोवरला जाण्यासाठी भारतातूनही अनेक पर्यटक नेपाळमध्ये गेले होते. महाराष्ट्रातून सुमारे 80 पर्यटक नेपाळला गेल्याची माहिती आहे. यापैकी आतापर्यंत केवळ चार जणांशी संपर्क होऊ शकला असून ते सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातून सुमारे 80 पर्यटक मानसरोवरला गेले असून त्यापैकी आतापर्यंत चार जणांशी संपर्क झाला आहे. हे चारही पर्यटक सुखरूप असल्याचं आहेत.
रिचा टूर ट्रॅव्हल्सच्या दोन गाड्यांमधून हे पर्यटक मानसरोवरला गेले होते. त्यापैकी एका गाडीत 37 पर्यटक असल्याची माहिती आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांतील नागरिकांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 37 जणांमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती पर्यटक आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महाजन यांच्या शेजारी राहणारं एक कुटुंबही पाच-सहा दिवसांपूर्वी नेपाळला गेलं होतं. त्यांच्याशी यापूर्वी संपर्क झाला होता. मात्र, आज सकाळपासून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून सध्या त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती आहे. हे पर्यटक प्रदक्षिणा करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेपाळमध्ये आणखी किती भारतीय पर्यटक अडकले आहेत, याची माहिती घेतली जातेय. जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांच्या जिल्ह्यातील नेपाळला गेलेल्या पर्यटकांची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे.
तुमचे नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे कोणी नेपाळला गेले असतील, तर त्यांची माहिती सरकारला द्यावी, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित पर्यटकांचा शोध घेण्यास मदत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्र आणि राज्य सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून दिल्लीतील संबंधित यंत्रणांशीही संपर्क सुरू आहे. महाराष्ट्र सरकार नेपाळ सरकारच्या संपर्कात असून बेपत्ता किंवा संपर्काबाहेर असलेल्या पर्यटकांची माहिती गोळा केली जातेय.
केंद्र आणि राज्य सरकार 24 तास अलर्ट मोडवर असल्याचं महाजन यांनी सांगितलं. तसंच नेपाळमधील महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.