Ajit Pawar News: आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक; अजित पवारांनी शिंदे सरकारला सुनावलं

Ajit Pawar News: 'आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
Ajit Pawar, eknath shinde
Ajit Pawar, eknath shindesaam tv
Published On

Ajit Pawar News: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज आळंदीमधून प्रस्थान होत आहे. आजच मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. याची गंभीर दखल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी घेतली आहे. 'आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

'संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं'.

'वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूरवारी सारख्या सोहळ्यात सहभागी होतांना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून, वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट: पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे

आळंदीतील घटनेवर पिंपरी-चिंचवडवरील घटनेवर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले.

'मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com