नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. कधी नव्हे ते नीटच्या परीक्षांचा चांगलाच गोंधळ उडाला, अशा शब्दांत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे.
देशभरात नीट परीक्षांवरून जबरदस्त गोंधळ सुरू असून या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी घडत आहेत. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, "पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी सकरावर केला आहे.
१२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक?
नीट परिक्षेच्या निकालाचा वाद ताजा असतानाच शिक्षण मंत्रालयाने एनटीएमार्फत घेण्यात येणाऱ्या युजीसी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय घेतला. परीक्षेमध्ये अनियमितता झाल्याचे सांगत शिक्षण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला होता. त्यावरूनही जयंत पाटलांनी सरकराला प्रश्न विचारलाय.
अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे? असा सवाल उपस्थित करत असताना प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत असं जयंत पाटील म्हणाले.
तरुणांनी टोकाचे निर्णय घेतल्यास केंद्र सरकार जबाबदार
या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असा इशाराही जयंत पाटील यांनी शेवटी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.