सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यात तळोदा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चौगाव नदीला मोठा पूर आला आहे, ज्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तळोदा तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. यामुळे नदी- नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र देखील पाहण्यास मिळत आहे. शिवाय नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली असून पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नदीने ओलांडली धोक्याची पातळी
तळोदा तालुक्यातील चौगाव नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने नदीकाठच्या चौगाव, बोरगाव, आणि इतर गावांमध्ये पाहणी केली आहे. नागरिकांनी नदीच्या आणि नाल्यांच्या जवळपास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष स्थापन
दरम्यान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ०२५६७-२३२३६७ हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. पूरबाधित गावांमध्ये मदतकार्य पोहोचवण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.