नांदुरा आणि मलकापूर तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा मृत्यू
चौघांपैकी तिघांचा मृत्यू तर एक मुलगा अजूनही बेपत्ता आहे.
हे तरुण ज्ञानगंगा व नळगंगा नदीत बुडाले आहेत.
मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अशातच पोहण्याचा मोह न आवरल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याचं कारण समोर आलं आहे. सदर घटना ही नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील गावात घडली आहे. या दुर्घटनेत करण भोंबळे, वैभव फुके, शुभम दवंगे यांचा मृत्यू झाला असून सोहम सोनवणे अद्याप बेपत्ता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत करण भोंबळे (वर्षे १८) आणि वैभव फुके (वर्षे २५) हे दोघे पोहण्यासाठी नदीत उतरले होते. पोहताना खूप आत गेल्यावर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली. या घटनेमुळे निमगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.
दुसरीकडे मलकापूर तालुक्यात दसरखेड येथील ५ अल्पवयीन मुले रविवारी दुपारी नळगंगा नदीपात्रातील केशोबा मंदिराजवळील डोहात पोहायला गेली होती. यातील शुभम दवंगे ( वर्षे १६) आणि सोहम उर्फ कांच्या सोनवणे (वर्षे १५ ) यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र या दोघांनाही पोहताना पाण्याची खोली लक्षात न आल्याने शुभम व सोहम दोघेही बुडाले.
इतर ३ मित्रांना शुभम आणि सोहम नदी पात्रात न दिसल्याने त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी केलेल्या शोधमोहीमेत शुभम दवंगे याचा मृतदेह सापडला. मात्र, सोहम सोनवणे याचा शोध अद्यापही लागलेला नाही. या घटनेमुळे निमगाव सह दसरखेड या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. तसेच मृत मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.