नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी व आसना नदीला पूर.
गाडेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने नांदेड-मुदखेड महामार्ग बंद.
विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडून १.६२ लाख क्युसेक पाणी सोडले.
शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान, प्रशासनाने NDRF पथके तैनात केली.
नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरीसह अनेक उपनद्यांना मोठा पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी, तसेच सर्वसामान्य नागरिक चिंतेत सापडले आहेत.
नांदेड जिल्ह्यात आसना नदीला आलेल्या पुरामुळे गाडेगाव परिसरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड ते मुदखेड या राज्य महामार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. मात्र आता तो पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
दरम्यान, नांदेड शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणावर पाण्याचा प्रचंड ताण आला आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून तब्बल एक लाख ६२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जात आहे. यामुळे गोदावरीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतजमिनींमध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, तूर यासह खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर येत आहे. काही ठिकाणी जनावरांसाठी चाराही संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.