
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा आणि पुतण्या इतकेच ओबीसी आहेत. दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार? अशी खोचक टीका राज्याचे नवे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. सोमवारी मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात ४० मिनिट चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. चूक असेल तर समजूत काढणार ना, चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार, असंही कोकाटे यावेळी म्हणाले.
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही पार पडलं आहे. यावेळी महायुतीने मंत्रिमंडळात नव्या चहऱ्यांना स्थान देत अनेक जुन्या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने भुजबळ मात्र चांगलेच नाराज असल्याचं बघायला मिळत आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही नाराजी अधिक आहे.
आपली नाराजी भुजबळांनी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. पुढची भूमिका ठरवण्यासाठी भुजबळांनी ओबीसी नेत्यांशी चर्चाही केली. त्यानंतर आज त्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ४० मिनिटं चर्चा केली. त्यावर फडणवीस यांनी पुढील निर्णयासाठी ८ ते १० दिवसांचा अवधी मागितला असल्याचं भेटीनंतर भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं. त्यामुळे भुजबळांची पुढची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही.
भुजबळ यांच्या नाराजी नंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यानीच भुजबळ यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ हे राजकीय विरोधक आहेत. तर भुजबळ यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून अजित पवार यांनी कोकाटे यांना मंत्री केलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या टिकेनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे वाद समोर आले असल्याने भुजबळ अजित पवार यांची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सगळ्या प्रकरणावर आता राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना टोला लगावला आहे. पुढे बोलताना कोकाटे म्हणाले की, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या मनातलं शल्य बोलून दाखवलं ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असेल, तर मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे करतील.
आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नाही. भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. मंत्रिमंडळात 17 मंत्री हे ओबीसी तर 16 मंत्री मराठा आहेत. ओबीसींना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
आमच्या पक्षाने भुजबळांवर कोणताही अन्याय केलेला नाही, त्यामुळे भुजबळांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही. भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मी मध्यस्थी करणार नाही. राज्यातील गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रितपणे राहतात. त्यामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण करणं हा विचारच मला पटत नाही. त्यांचं जातीयवादाचं ढोंग मला अजिबात मान्य नाही, असं खरमरीत उत्तरही यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे.
तर, कृषी खात आव्हानात्मक असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन म्हणून जे जे करता येईल ते ते करण्याचा माझा प्रयत्न असेल, असं सांगत कांद्याचे भाव कमी झालेत ही गोष्ट खरी आहे. निर्यात शुल्क कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात कांद्याचे भाव देखील वाढतील. कांद्याच्या भावावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. केंद्रीय कृषिमंत्र्यांना सोबत घेऊन धोरणात्मक निर्णय करावा लागेल असं त्यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.