
मंगेश कचरे, साम प्रतिनिधी
राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या महायुतीतील तिन्ही पक्ष कारखान्याच्या निवडणुकीत मात्र समोरासमोर आलेत. भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी इंदापुरात छत्रपती कारखान्याची निवडणूक लढण्यावर ठाम असल्यानं इंदापुरातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोण सरस ठरणार पाहावं लागेल. विशेष म्हणजे, अजित पवारांनी काल सर्वपक्षीय बैठक घेत निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी करण्याची घोषणा केली होती.
मात्र त्यांच्या बैठकीनंतरही तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ही निवडणूक खूप चुरशीची ठरणार आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. या निवडणुकीत महायुतीमधील युती दाखवण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेत निवडणूक एकतर्फी करण्याचा निर्णय घेतला. पण महायुतीच्या नेत्यांमध्ये मात्र त्याबाबत दुमत आहे.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालीय. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल भवानीनगर येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. यात पृथ्वीराज जाचक यांच्याशी युती साधत ही निवडणूक बिनविरोध करण्यास किंवा एकतर्फी करण्यासाठी समविचारी लोकांना एकत्र घेऊन निवडणूक लढवावी अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. मात्र आता अजित पवारांच्या या निर्णयाला महायुतीमधील नेत्यांनीच विरोध दर्शवलाय.
भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आपण लढवणार असल्याचं घोषित केलं. त्यामुळे भाजप-शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत बिनसलंय.
निवडणुकीत विजय पराजय ठरलेला असतो, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कालच्या सर्वपक्षीय मेळाव्यात निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर एकतर्फी निवडणूक करू, असं सांगितलं. हे त्यांचं वक्तव्य आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला कोणीही हौसे नवसे गवसे फॉर्म भरतील हे जे वक्तव्य आहे.
यामुळे सभासदांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. स्वतःचं संचालक मंडळ भ्रष्ट आहे म्हणून तुम्ही तिथे सांगता, पण पाच-सहा वर्ष तुम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देत नाही. या सगळ्याच्या विरोधामध्ये आणि कारखान्याला पूर्वीचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढणार, असल्याचं भाजप नेते तानाजी थोरात म्हणाले.
आम्ही पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत काम केलं आहे, परंतु त्यावेळी त्यांचे रंग आम्हाला माहिती नव्हते. मागील वेळेस पृथ्वीराज जाचक गद्दार माणूस आहे, असं अजित पवार यांनी त्यांच्या जाहीर सभेत सांगितलं होतं. आता त्याच गद्दार माणसाबरोबर काम करायला तयार होतोय नेमका काय चमत्कार झाला, असा सवाल भाजप नेत्यानं विचारलाय. गेले २०-२२ वर्षे पृथ्वीराज जाचक हे राष्ट्रवादीचे विरोधक म्हणून काम करतात, मग एका रात्रीत तुमचे साठेलोटं होतं. याचा अर्थ तुम्ही २०- २२ वर्षे सभासदांना झुलवत ठेवत होता का? असाही सवाल त्यांनी केलाय.
साखर कारखाना अडचणीत आहे, हे म्हणणं चुकीच आहे. कारण आतापर्यंत निवडणूक आयोगाला कारखान्याचे ३४ लाख रुपये भरले आहेत. मग निवडणूक झाली तर कारखाना तोट्यात जायचं काय कारण आहे. आज कारखान्यावर २००- ३०० कोटी रुपयांचं कर्ज झालं असं सांगण्यात येतं मग कारखाना तुमच्या ताब्यात आहे, मग एवढे वर्ष तुम्ही त्याकडे डोळेझाक का केली? असा सवाल करत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि शिंदे गटाचे पदाधिकारी यासोबतच समविचारी लोकसोबत घेऊन आम्ही आमचं पॅनल तयार ठेवलं असल्याचं तानाजी थोरात म्हणाले.
या अशा निवडणुकीत वरिष्ठ लक्ष घालत नाहीत. प्रत्येक निवडणुका या महायुतीत लढा आम्ही आजपर्यंत लढवल्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. मग कारखान्यासारख्या निवडणुका आमच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा समविचारी लोकांनी लढवायच्याच नाहीत, असंही पक्ष आम्हाला सांगणार नाही ना. अजित पवारांचे नेतृत्व आम्ही मान्य करतो. ते आमच्या महायुतीत आहेत.
खांद्याला खांदा लावून काम करत आहोत पण पृथ्वीराज जाचक कोण ? पृथ्वीराज जाचक यांना विचारा की तुमचा पक्ष कोणता. तुम्ही सर्वपक्षीय बैठक घेता तसं नाव देता, मग तुम्हाला तर माहित आहे का, की तुमचा स्वतःचा पक्ष कोणता? असा सवाल तानाजी थोरात यांनी पृथ्वीराज जाचकांना केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.