महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिका पाहायला मिळणार
१ मे रोजी १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार
पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे स्पष्ट चित्र पाहता येईल
विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पिहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालपत्रासह आता उत्तरपत्रिकाही पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक चित्र पालकांसमोर येण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता निकालपत्रासह उत्तरपत्रिका बघायला मिळणार आहे. १ मे म्हणजे उद्या निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी म्हणजे १ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. शिक्षण विभागाने यंदा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत अभिनव बदल केला आहे. यंदा निकालादरम्यान विद्यार्थ्यांच्या निकालपत्रकासोबतच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये किती प्रगती झाली आहे हे कळेल.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत संयुक्त परिपत्रक काढत हा निर्णय घेतला आहे. त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीत एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाच्या सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वी १ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये नमूद केल्यानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करणे, शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या निकालपत्रासह उत्तरपत्रिका पालकांना दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, निकालासोबत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवल्यामुळे पालकांना आपल्या मुलाची अभ्यासात किती प्रगती झाली आहे किंवा अभ्यासात काय उणिवा आहेत हे लक्षात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या मुलांचा घरी नियमित सराव करून घेता येईल. विद्यार्थ्यांना त्यांना योग्य ते मार्गदर्शन करता येईल. पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक सवयी विकसित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावता येईल. निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवल्यामुळे शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रित होईल. त्याचसोबत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग आणि जबाबदार होती , असे गोसावी आणि डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.