जून कोरडाच, जुलैमध्येही पावसाचा तोटा? पेरण्या रखडल्या, बळीराजा संकटात

Delayed Monsoon Hits Farmers Hard: राज्यात जून उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. जून महिन्यानंतर आता जुलैमध्येही पाऊस पाठ फिरवणार का ? या भीतीनं शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट कसं पसरलयं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Farmers look towards the sky as delayed monsoon and poor rainfall disrupt sowing activities across Maharashtra.
Farmers look towards the sky as delayed monsoon and poor rainfall disrupt sowing activities across Maharashtra.saam tv
Published On

जून महिना संपला, पण वरुणराजाने महाराष्ट्राकडे साफ पाठ फिरवली.... त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा जुलै महिन्याकडे लागल्या आहेत. पण हवामान विभागाने दिलेला अंदाज ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलीय...कारण जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 'एल निनो'च्या प्रभावामुळे जुलै महिनाही कोरडाच जाणार की काय? अशी भीती निर्माण झालीय....राज्यातील अनेक जिल्ह्यात पेरण्या रखडल्या असून शेतकरी संकटात आलाय.

राज्यात 1 जुलैपर्यंत फक्त 20 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून गेल्या वर्षी 1 जुलैला 62 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या... त्यामुळे 1 जुलै 2026 अखेरीस राज्यात प्रत्यक्ष 28 लाख 39 हजार 363 हेक्टर पेरण्या झाल्या आहेत.. गेल्या वर्षी 1 जुलैला 88 लाख 80 हजार 628 हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या....

हीच आकडेवारी विभागवार पाहिली तर कोकण विभागात 3 टक्के, नाशिक विभागात 32 टक्के, पुणे विभागात 11 टक्के, कोल्हापूर विभागात 12 टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 टक्के पेरण्यात झालेत... लातूर विभागात 13 टक्के तर अमरावती विभागात 24 आणि नागपूर विभागात 19 टक्के पेरण्या पूर्ण झालेत...

दुष्काळाची भीषण झळ सोसतोय तो मराठवाडा...ढग दाटून येतायत. मात्र पाऊस पडत नाहीये. त्यामुळे लातूर जिल्ह्यात तब्बल 6 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्यायत. पाऊस गायब झाल्यानं आता लातूरमधील बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेत. जालना जिल्ह्याची स्थिती तर आणखी भयानक आहे. जिल्ह्यात तब्बल 90 टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असूनही पावसानं हुलकावणी दिलीय.. मनमाडमध्ये पावसाअभावी पेरणीची कामं खोळंबलीयत. त्यामुळे बळीराजा हतबल झालाय.

दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात तर शेतकऱ्यावर दुहेरी सकंट ओढावलयं... एकीकडे पाऊसामुळे पेरण्या रखडल्या आहेतच, त्यात ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला थोड्या पावसानंतर पेरणीची घाई केली, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलंयं...त्यामुळेच 75 मिमी ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलयं...

जूनने दगा दिलाय आणि जुलै महिनाही कोरडा राहण्याचा अंदाज आहे. जूनमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ४७ टक्केच पाऊस झाला...तर राज्यातील धरणांमध्येही 22.49 % पाणीसाठा शिल्लक आहे... त्यामुळे जर पुढील काही दिवसांत पावसानं साथ दिली नाही तर शेती सोडा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. सरकार आता यावर काय उपाययोजना करणार आणि बळीराजाला या संकटातून कसं बाहेर काढणार, याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com