महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणक्षेत्रे तुडुंब भरली.
पुणे जिल्ह्यातील चार धरणे ९०% पर्यंत भरल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटला.
राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, इसापूर व सिद्धेश्वर धरणे पूर्ण क्षमतेने भरली; पुढील वर्षभरासाठी पुरेसा पाणी साठा.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रे तुडुंब भरली असून पुणे, वाशीम, कोल्हापूर, हिंगोली, अमरावती, धाराशी जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही भागांत शेती पाण्याखाली गेल्याने नुकसानही झाले आहे. मात्र, एकंदरीत पाहता पाण्याची टंचाई मिटल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचे महत्त्वाचे स्रोत असलेली खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे तब्बल ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यापैकी खडकवासला धरणात ५३.१२ टक्के तर पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच निरा देवघर धरण ९८.२८ टक्के भरले असून धरणामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. त्यामुळे सकाळी ८.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्याद्वारे तब्बल ६,८८० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात आणखी बदल होऊ शकतो असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुण्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी आधी झालेल्या पावसामुळे जलसाठ्याची पातळी समाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात या वेळेस सुमारे सात टक्के कमी पाणी साठा असल्याचे दिसून येत आहे,
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने तेर, ढोकीसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कुकसा प्रकल्पही तुडुंब भरून वाहत आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटल्या आहेत. मात्र, प्रशासनाने नागरिकांना धरण परिसरात सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात पाणीसाठ्यात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या या धरणात ६५ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या धरणांमध्येही ६६ टक्के जलसाठा झालेला आहे. तरीही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जलसाठा कमी असल्याने पाणी नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प येलदरी, इसापूर आणि सिद्धेश्वर हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पुढील वर्षभरासाठी हिंगोलीसह परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या ७,२१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
यंदाच्या पावसाने धरणक्षेत्र भरून वाहायला सुरुवात केली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात दूर होईल, मात्र अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसानही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची ही ‘बॅटिंग’ आनंदासोबतच थोडी चिंता देखील निर्माण करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.