Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, निवडणूक आयोग, राहुल गांधी, राज-उद्धव मनपा युती, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

शेवटच्या श्रावणी सोमवारीच त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक संतप्त

- शेवटच्या श्रावणी सोमवारीच त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक संतप्त

- दर्शनावेळी महिला भविकांसोबत पुरुष सुरक्षारक्षक ग़ैरवर्तवणुक करत असल्याचा आरोप

- महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या भाविकांकडून त्र्यम्बकेश्वर संस्थानच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त

- भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये झाली बाचाबाची

- दोनच दिवसांपूर्वी भाविकांना मारहाण केल्याची घटना आली होती समोर

मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब वे देखील पाण्याखाली गेला असून साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी सव वेत साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अंधेरी सब वे परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आढावा

नांदेडच्या मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांना पुराचा वेढा.

अनेक जनावर दगावली, शेती पिकाचे मोठे नुकसान

रावणगाव येथे एनडीआरएफची टीम पोहोचली

पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

एनडीआरएफ टीमच्या वतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू.

"बॉस" रेशन देतील पण गरीबी दाखवण्यासाठी दागिने मला द्या म्हणत पुण्यात महिलेची फसवणूक

पुण्यात फसवणुकीचे विविध प्रकार दररोज समोर येत आहेत. आता पुण्यात एका महिलेला रेशन देण्याच्या नावाखाली तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने महिलेशी ओळख केली आणि एका कंपनी मध्ये असल्याचं भासवून रेशन आणि इतर वस्तू मिळतील अशी हमी या महिलेला दिली. "आमचे बॉस रेशन व इतर वस्तू देतील. तुम्ही माझ्या बरोबर चला" असं म्हणत त्या व्यक्तीने त्या महिलेला बायफ रोडला नेले. "तुम्हाला गरीब दाखवायचं आहे म्हणून दागिने काढून द्या" असे या व्यक्तीने त्या महिलेला सांगितले आणि तिच्याकडून दागिने स्वतःकडे घेतले आणि फरार झाला. हा सगळा प्रकार १४ ऑगस्ट रोजी पुण्यातील वाघोली भागात घडला असून त्याचा सी सी टिव्ही सुद्धा आता समोर आला आहे.

रायगड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस

रायगड जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता तर आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रस्त्यावर, सखल भागात पाणी साचले असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी धोकादायक परिस्थिती कुठेही नाही. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे

मेहेकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस..

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर व सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे.. सततधार पावसाने मेहेकर तालुक्यातिल् नागरिक हैराण झाले आहेत.. जानेफळ गावनाजिक खातोडी नदीला महापूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मेहेकर खामगाव राज्यमार्ग बंद झाला आहे सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे, दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या असून पावसाचा जोर वाढतच आहे...

दोन वेळेस तयार करण्यात आला थातूरमातूर पूल दोन्ही पावसात वाहून गेला

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सय्यदपूर हे गाव जालना लोकसभा मतदारसंघात येते. हे गाव जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची सासुरवाटी देखील आहे. लाडसावंगी बाजारपेठेत येण्यासाठी दुधना नदीवर असलेला एकमेव मोठा फूल येथे नव्याने बांधण्यात येत आहे, तोपर्यंत गावात ये-जा करण्यासाठी तात्पुरता पूल एका गुत्तेदाराने बांधून दिला होता. मात्र, 19 जुलै रोजी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात हा पूल पूर्णतः वाहून गेला. त्यानंतर नागरिकांच्या आणि रुग्णांच्या हालअपेष्टांमुळे तो परत थातूरमातूर स्वरुपात उभारण्यात आला आणि वाहतूक सुरु करण्यात आली. पण 17 ऑगस्ट रोजी दुधना नदीच्या उगमस्थानी मुसळधार पावसामुळे रात्री दहा वाजता मोठा पूर आला. हा तात्पुरता पूल दुसऱ्यांदा वाहून गेला परिणामी, ग्रामस्थांनी पुढील वाहतुकीसाठी पीव्हीसी पाईपवर लाकडी फळ्या टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. मात्र, पुन्हा मोठा पूर आल्यास हा रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दाखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 108 गावातील 38 हजार हेक्टर वरील पिकाचे नुकसान

धाराशिव जिल्ह्यात गेली तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलय. जिल्ह्यातील 108 गावातील 38 हजार हेक्टर वरील पिकाचे या अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले आहे.तर 53 जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याचा प्राथमिक अहवाल महसूल आणि कृषी विभागाने सादर केला आहे, जिल्ह्यात महत्त्वाचं असणार सोयाबीन पिकाच मोठ नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला,  अंबरनाथच्या ग्रीन सिटी सोसायटीच्या आवारातील घटना

अंबरनाथच्या ग्रीन सिटी या सासायटीच्या आवारात आपल्या आई सोबत जाणाऱ्या एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ल्या केल्याची घटना घडली, या हल्ल्यात तो चिमुकला गंभीर जखमी झालाय ,सुदैवाने सोसायटीतील रहिवाशांनी तत्काळ धाव घेत त्या चिमुकल्याला त्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली ,ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, या घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोकणात मुसळधार पाऊस.

कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे... किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे... मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे.

बनावट शालार्थ आयडीने लिपिक बनलेल्या दोन सख्या भावांना पोलिसांनी केली अटक

- 5 वर्षीय मंगेश केशव निनावे आणि 32 वर्षीय मनीष कुमार केशव निनावे अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत

- नागपुरातील दोन वेगवेगळ्या शाळेत या दोन्ही भावांची बनावट शालार्थ आयडीने नियुक्ती करण्यात आल्याचे चौकशीत समोर

- या अटकेनंतर बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 20 झाली आहे

- नागपूरच्या हुडकेश्वर येथील श्रावणजी वाटकर उच्च प्राथमिक शाळेत मंगेश निनावे याची कनिष्ठ लिपिकी पदावर मार्च 2023 मध्ये नियुक्ती झाली होती

- तर मनीष कुमार याची केशवनगर उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर जुलै 2019 मध्ये नियुक्ती झाली होती

- त्यांनी अधिकारी व दलालाच्या माध्यमातून बोगस शालार्थ आयडी तयार करून घेतला होता

पूर्णा नदीला महापूर, कावडधारी भक्तांची पुलावर धोकेदायक गर्दी

आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार... यामुळे अनेक कावडधारी शिवभक्त नांदुरा - जळगाव जामोद दरम्यान असलेल्या पूर्णा नदीतील पवित्र जल घेण्यासाठी मानेगाव येथील धोकादायक पुलावर गर्दी करत आहेत. यातच अकोला, अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णा नदीला महापूर आलेला आहे. महापुरातील पाणी घेण्यासाठी धोकादायक पद्धतीने पुलावर कावडधार्‍यांची गर्दी बघायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी बुलढाणा महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी हजर नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जाग होईल का..?असा सवाल उपस्थित राहत आहे.

उतावळी नदीला पूर... छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरची वाहतूक ठप्प

वाशिमच्या उतावळी नदीला पुर आल्याने छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावरची गेल्या एका तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. वाशिमच्या कुकसा, पिंपरी सरहद्द गावा जवळील पुलावरून उतावळी नदीचे पाणी वाहत असल्याने ही वाहतूक बंद झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. समृद्धी महामार्गावर वाहणारे सर्व पाणी उतावळी नदीत प्रवाहीत करण्यात आले आहे. त्यामुळे उतावळी नदीला नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होत आहे.

बीड जिल्ह्यात धुवाधार पाऊस पावसाचा हाहाकार नदी नाल्यांना पूर.

राज्यामध्ये सर्व दूर पावसाने धुमाकूळ घातला असून बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे.जोरदार पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला असून माजलगाव च्या सरस्वती नदीला पूर आला आहे.माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदी सिमरी पारगाव, उंब्री,जिवणापूर,मोगरा,डाके पिंपरी ,आनदगाव ,साळेगांव कोथाळा ते पोहणेर रस्ता बंद माजलगाव ते मोगरा रस्ता बंद खडकी नदिवर फुल वाहुन गेला आहे.

जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप आला असून यामध्ये कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे कपाशी पिकांना अचानक माना टाकले आहेत या मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात किती पाणी?

ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात ७ टक्के कमी पाणीसाठा

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वरुणराजा ची पुणे जिल्ह्यात विश्रांती

पुण्यातील चार ही धरणे मिळून एकूण ९० टक्के पाणीसाठा

कुठल्या धरणात किती पाणीसाठा

खडकवासला: ५३.१२ टक्के

पानशेत: ९२.६८ टक्के

वरसगाव: ९२.३७

टेमघर: ९५.९५

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित

बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन मोबदला वाढवावा आणि पुनर्वसनाची हमी द्यावी, अशी मागणी केली.

साखर संकुलात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीही उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी सात गावांतील जमिनी संपादित होणार असून, १३ हजार ३०० खातेदारांपैकी २,४७१ जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. काही शेतकरी स्वेच्छेने जमीन द्यायला तयार असले तरी मोबदला अपुरा असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

सरकारकडून एरोसिटीमध्ये डेव्हलप प्लॉट देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मात्र त्याबाबत संभ्रम आहे.

पवार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लवकरच चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

जुलै महिन्यात पुणे विभागातील मद्य विक्रीत तब्बल आठ लाख लिटरने घट

राज्य सरकारने जूनअखेर दारूवरील उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर परिणाम

उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात ४.९१ लाख लिटर, अहिल्यानगरमध्ये ३० हजार आणि सोलापूरमध्ये २.६७ लाख लिटर विक्री कमी झाली

जूनमध्ये विभागात देशी दारू ३२.९२ लाख, विदेशी दारू ४६.२४ लाख आणि बिअर ५४.५६ लाख लिटर विकली गेली

मात्र जुलैमध्ये अनुक्रमे १४ हजार, ३.१२ लाख आणि १.६५ लाख लिटरने घट झाली

बिअर आणि विदेशी दारूला सर्वाधिक फटका बसल्याची माहिती

शुल्कवाढ, श्रावणातील उपास, तसेच काही दिवस पुरवठा ठप्प राहिल्याने ही घट झाल्याचे कारण समोर आले असून, व्यापारी वर्गात सुद्धा चिंता

पुण्यात मध्यरात्री "बार्निंग बस"चा थरार

मुंबई - बेंगलोर महामार्गवर प्रवासी बसला आग

ही घटना रात्री २ वाजता पुण्यातील नऱ्हे भागात घडली

एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला भीषण आग

पुणे व पीएमआरडीकडील अग्निशमन दलाकडून सदर बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण

सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली

अकोल्यात अपघात, १७ भाविक जखमी

अकोल्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने अपघात होत तब्बल 17 शिवभक्त जखमी झालेये.. गांधीग्राम येथून कावड आणण्यासाठी हे शिवभक्त ट्रॅक्टर द्वारे जात होते.. अचानकपणे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रॅक्टर पलटी झालाय.. यात 17 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज संपुर्ण अकोला शहर हर-हर महादेव, बम-बम भोले'च्याच्या गजरानं दुमदुमून जाणार आहेये, अशातच आता कावड यात्रापूर्वी डाबकी रोड वासी या कावडमधील शिवभक्तांच्या वाहनांचा अपघात झाला आहे.

पनवेल विधानसभा मतदार संघात तब्बल ८५ हजार दुबार मतदार. माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप

पनवेल विधानसभेत तब्बल ८५ हजार दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. याबाबत हायकोर्टात जुलै २०२४ ला रिटपिटीशन दाखल केले होते.

हाय कोर्टाने सुनावणी घेत दुबार मतदारांची नावे वगळण्याचे आदेश दिला होते. मात्र यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करीत नावे वगळली नाहीत. पनवेल विधानसभा मतदार संघांतील मतदारांची नावे ऐरोली , बेलापूर , उरण या बाजूला असलेल्या विधानसभा मतदार संघात आढळली आहेत. दरम्यान पनवेल विधानसभेत ११ हजार ५०० लोकांनी एकाच मतदार संघात दोनदा मतदान केल्याची नोंद आढळली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने समोर आणले आहे.

मुसळधार पावसानं साकोली आठवडी बाजारातील भाजीपाला वाहून गेला

भंडाऱ्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली. साकोली येथील आठवडी बाजार असल्यानं दुपारी भाजी विक्रेत्यांनी दुकानं सजवली होती. सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसानं भाजी विक्रेत्यांनी सजविलेल्या दुकानातील भाजीपाला अक्षरश: पावसात वाहून गेला. साकोली येथील मुख्य मार्गालगत आठवडी बाजार भरतो. सखल भाग असल्यानं मुसळधार पावसाचं पाणी तिथून वाहू लागलं, आणि त्यातचं हा भाजीपाला वाहत असल्यानं भाजीविक्रेत्यांना वाहून जाणारा भाजीपाला वाचविताना चांगलीच कसरत करावी लागली. किंबहुना यात अनेक भाजी विक्रेत्यांचा वाहून जाणार भाजीपाला पडताना कसरत करावी लागली. भाजीपाला वाहून गेल्यानं विक्रेत्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

चौथ्या श्रावणी निमित्त औंढा नागनाथ मध्ये भाविकांची मोठी गर्दी

चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मध्ये भाविकांनी प्रभू शिव शंकराच्या दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली होती शासकीय महापूजा आटोपल्यानंतर हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते दरम्यान पोलीस प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती .

धाराशिव जिल्ह्यातील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो,भाजपकडून जलपूजन

धाराशिव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.भारतीय जनता पार्टी कडून प्रकल्पातील पाण्याचे जलपूजनच करण्यात आलं.भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विधिवत पूजा करत जलपूजन केलं. तेरणा प्रकल्प भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धाराशिवसह तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.

पुसद येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळच्या पुसद येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज १३ प्रयोगशील शेतकरी व दोन कृषी शास्त्रज्ञांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात दुपारी १.३० वाजता सन्मान सोहळा पार पडणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री संजय राठोड, मंत्री डॉ अशोक उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे उपस्थित राहणार आहे.

दिवाळी पूर्वी बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड..

बुलढाणा शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थाण राज्य स्तर योजनेचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा अल्टीमेटम आमदार संजय गायकवाड व नगरपालिकेकडून संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहेत.. पाईपलाईनच्या पाच टप्प्यापैकी चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून ठीक ठिकाणी खोदलेल्या ठिकाणी काँक्रीट पॅचेस मारणे सुरू असून पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाइपलाइनची टेस्टिंग देखील सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण योजनेत तब्बल 170 किलोमीटरची पाईपलाईन टाकून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बुलढाणा शहर वासियांना नियमित गोड पाण्याचा पुरवठा करून दिवाळी गोड केली जाणार आहे..

तामसा ते हिमायतनगर महामार्गावरील आष्टी गावाजवळ खचलेल्या पुलामुळे अपघात

तामसा ते हिमायतनगर या महामार्गावरील आष्टी गावाजवळ काही महिन्यापूर्वी मोठ्या पुलाच्या बाजूला छोटा पूल उभारण्यात आला होता. तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे हा पूल दोन दिवसांपूर्वी खचला आहे.त्यामुळे महामार्गावर जात असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या सोबत असलेलं लहान मुलं किरकोळ जखमी झाले आहे.गंभीर जखमी झालेल्या महिलेवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

कळमनुरी पालिकेच्या गलथन कारभारामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयात घुसले पाणी

हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाला असताना कळमनुरी शहरात पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय परिसरात कळमनुरी शहरातील नाल्यांचे पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती, कार्यालयाच्या प्रांगणात कमरे एवढं पाणी असल्याने कार्यालयात जायचे कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडला होता.

घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी

शेवटचा श्रावण सोमवार असल्याने वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातून शिवभक्त दाखल

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन केल्यानंतरच ज्योतिर्लिंग परिक्रमा होते पूर्ण अशी आख्यायिका

आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांची मंदिरामध्ये मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी

जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतो आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार गावात आणि परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला आहे.या पावसाळे परिसरातील ओढ्याना पूर आला आहे.तर काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसणार आहे. जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकाची अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे..

धाराशिव जिल्ह्यातील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो,भाजपकडून जलपूजन

धाराशिव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.भारतीय जनता पार्टी कडून प्रकल्पातील पाण्याचे जलपूजनच करण्यात आलं.भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विधिवत पूजा करत जलपूजन केलं. तेरणा प्रकल्प भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धाराशिवसह तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com