

केंद्राचं पथक महाराष्ट्रात येणार
अतिवृष्टीग्रस्त भागांतील नुकसानीची पाहणी करणार
मंगळवार, बुधवारी पथकातील सदस्य प्रत्यक्ष भेट देणार
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक महाराष्ट्रात येणार आहे. अतिवृष्टी ज्या ठिकाणी झाली आहे, त्याची सविस्तर माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. हे पथक काही भागांत प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
राज्यातील अतिवृष्टीबाधित भागांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवार, ३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येत आहे. हे पथक मंगळवारी आणि बुधवारी विविध भागांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. हे पथक मराठवाड्यातील काही भागांचीही पाहणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय यांच्या नेतृत्वाखालील पथकात आठ जणांचा समावेश आहे. हे पथक ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबईत पोहचेल. त्यानंतर पथकातील सदस्य ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी विविध जिल्ह्यांत जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
त्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक माहिती तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय पथकाच्या दौऱ्याची सविस्तर रुपरेषा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरी देखील हे पथक मंगळवारी मराठवाड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार मदत दिली जाते. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर केंद्र सरकार मदतीची ही रक्कम राज्य सरकारला देईल. परंतु ही मदत राज्य सरकारने याआधीच जाहीर केलेली असून, सध्या तिचे वितरणही सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाची पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.