कळस गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.
परिसरातील डोंगर आणि उसामुळे बिबट्यांचा वावर कायम असल्याची माहिती.
वनविभागाने तातडीने पिंजरे लावले, गस्त वाढवली.
सरकारकडून मृताच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर.
शिरूर मधील पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर कळस-सुतार वस्ती रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाडगे हे गावातून आपल्या घराकडे रानमळ्याच्या वाटेने जात असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. गाडगे रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कळस परिसरात उसाची शेती व डोंगराळ भाग असल्याने येथे बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. यापूर्वी जनावरांवर हल्ले झाले असले तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडगे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी केली आहे. वनविभागाने घटनेची गंभीर दखल घेत दोन पिंजरे लावले असून तपास सुरू केला आहे. सरकारच्या नियमानुसार मृताच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये रोख व १५ लाख रुपयांच्या ठेव पावतीच्या स्वरूपात मदत मिळणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
कळस गावाच्या तिनही बाजूने डोंगर परिसर असून काही भागात उसाचे पीक आहे. त्यामुळे या भागात आठ-दहा बिबट्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे एकाला पकडले तरी इतर बिबटे येथे येत राहतात. ग्रामस्थांनी सतत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे वनविभागाने आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.