
'कुणी कितीही कर्कश्शपणे ओरडून इशारा देऊ देत, कुणाल कामरा घंटा माफी मागत नसतोय. स्वानुभवावरून सांगतो, विद्रोहाची आग कुणापुढे मिंधी नसते.', असे म्हणत अभिनेते किरण माने यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कमरा प्रकरणात उडी मारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत कुणाल कामरा माफी मागत नसतो असे म्हणत थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. किरण माने यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी राज्यात सध्या गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, प्रशांत कोरटकर प्रकरण, बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणाचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.
किरण माने यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर '…जनमत नसलेले नेते टीकेला घाबरतात', असे टायटल देत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारवर टीका करताना लिहिले की, '...यांना खरा राग कुणाल कामराचा नाही. कुणाल बोलताना ज्यापध्दतीनं तरुण पोरंपोरी हसताहेत आणि ज्या उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर देशभरातल्या जनतेनं हा व्हिडिओ व्हायरल केला. सगळा देश हसू लागला. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली!'
किरण माने यांनी विधानसभा निवडणूक निकालावरून देखील सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, 'भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवली आहे. ‘आपण मतदान न करूनही मतदार याद्यांमध्ये घोळ करून हे सत्तेत बसलेत.’ या संशयाबद्दलचा जनतेचा रोष रोज उफाळून येतोय. जनतेला आधी संशय होता, मारकडवाडी दाबल्यानंतर खात्री झाली. आता अशा घटनांमुळे तर संपूर्ण विश्वास बसू लागलाय. बरं या सत्ताधार्यांसोबत जे जे नेते आहेत, ते कुणीही मनापासून नाहीत. इडीच्यावगैरे धाकामुळं किंवा पद, पैशांच्या लालसेनं जवळ आहेत. त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडीयाची ट्रोलिंगची बाजू सांभाळतात. ते काय, नेते गुलाल उधळतील तिकडे चांगभलं करतात. ते ही मनापासून सत्तेसोबत नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरा याच्यामागे कुणाचातरी हात असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून देखील किरण माने यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'पण विरोधकांकडं कुठलंही आमिष नसून अजूनही विरोधकांची बाजू घेणारे कसे शिल्लक आहेत??? हा प्रश्न त्यांना पडतो. म्हणून कुणीही सत्ताधार्यांची चड्डी उतरवली की 'याच्यामागे कुणाचातरी हात आहे. याला कुणीतरी पैसे दिलेत. आम्ही बँक डिटेल्स तपासणार सिडीआर काढणार ही भाषा सुरू होते. पण अरे येड्याहो... आम्ही सगळे शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची लेकरं आहोत. संविधानप्रेमी आहोत. आम्हाला कुठली भिती किंवा कुठलं आमिष बोलायला लावत नाही.'
राज्यामध्ये घडलेल्या घटनांचा उल्लेख करत किरण माने यांनी सरकारवर टीका केली. 'जनमत नसलेले लोक टीकेला घाबरतात. पूर्वी बहुमत असलेले काँग्रेसी नेते टीकेला उडवून लावायचे. जेव्हा जनमत फिरले तेव्हा इंदीराजीही टीकेला घाबरू लागल्या होत्या. अंबरनाथ चिमुरडी बलात्कार प्रकरणापासून ते कोरटकरानं छत्रपतींना शिव्या देण्याची घटना असो... शिवरायांच्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारापासून सोमनाथ सुर्यवंशी-संतोष देशमुख हत्या असो... प्रत्येक प्रकरणानंतर जनतेची उत्स्फूर्तपणे येणारी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांना हादरवते आहे हे नक्की! ...बाकी या झुंडशाहीत, दडपशाहीतही जे लोक स्वाभिमान टिकवून आहेत त्यांचा नाद करू नका. बँक डिटेल्स, सीडीआर सोडा... आमचं रक्त तपासलंत तरी तुम्हाला कणभरही भेसळ आढळणार नाही. ', असे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.