अभिजित देशमुख
कल्याण : भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांसाठी वाढला आहे. रस्त्याने चालणाऱ्या पादचारी असो कि दुचाकीधारक या भटक्या कुत्र्यांमुळे दहशतीखाली आहेत. कारण कल्याण- डोंबिवली शहरात मागील दहा महिन्यात १८ हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवरून शहरात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याण जवळील टिटवाळा येथे एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. त्यापाठोपाठ कल्याण बेतूरकर पाडा परीसरात भटक्या कुत्र्याने आठ वर्षाच्या मुलाला चावा घेतल्याची घटना घडली. भटक्या कुत्र्यांचा त्रास मागील काही दिवसांपासून वाढला आहे. अशा अनेक घटना घडल्याने कल्याण- डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण- डोंबिवली शहरात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत १८ हजार ७०५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार शहरात दरमहा कुत्रे चावण्याच्या दोन हजार घटना घडत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. रात्री अपरात्री कामावरून परतणाऱ्या, तर कधी घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना भटके कुत्रे लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता पर्यंत १२ हजार ४०६ भटक्या कुत्र्यांचे निरबीजीकरण आणि लसीकरण करण्यात आले आहे. दरमहा सरासरी हजार ते बाराशे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. कुत्रा चावल्यानंतर तत्काळ उपचार घ्यावेत. केडीएमसी रुग्णालयात औषधी, इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.