
बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळुंखे यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. या प्रकरणामुळे महायुतीमध्ये राजकीय दुफळी निर्माण झाली आहे. यातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात या २ नेत्यांमघ्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्वत: निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार असलेले पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी लगेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातच पुढील निवडणुका लढविणार असल्याचे म्हटले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. सर्वच राजकीय पक्षांपासून अंतरावर असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आता अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे आता या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, 'नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना बीड जिल्ह्याविषयी माहिती सांगितली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्ह्यासंदर्भात आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी काय करता येईल, त्याबाबतीत प्रयत्न करा, अशा सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची गती समाधानकारक नाही, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.