राज्यात तापमानाचा पारा वाढत चालला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. अंगातून अक्षरश: घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाणीटंचाईचा सामान करावा लागत असल्याने गावकरी हैराण झाले आहेत. यामध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जालन्यामध्ये भीषण पाणीटंचाई (Jalna Water Issue) पाहायला मिळत असून चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे.
जालना जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई (Jalna Water Crisis) पाहायला मिळत आहे. गावा-गावात पाणीटंचाईच्या निवारणार्थ आता पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असले तरी ही हंडाभर पाण्यासाठी आता महिलांची पायपीट सुरूच आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्यासाठी देखील पायपीट करावी लागत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण चाऱ्यासाठी रानोरान फिरत आहेत. जालन्यामध्ये दुष्काळाची नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत...
जालना जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्यासाठी सर्वांना पायपीट करावी लागत आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. पाणीप्रकल्पात फारसं पाणी आलं नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचसोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील मोठा झाला आहे. मिळेल त्या ठिकाणाहून जनावरांसाठी चारा आणून मुक्या जनावरांची भूक भागवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही भीषण पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेता शेतकरी चिंतेत आला आहे.
दुसरीकडे ग्रामीण भागातील गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पिण्यासाठीच काय पण जिथे पाईपलाईनला गळती लागलीय तिथे महिलांना धुणी धुण्याची वेळ आलीय. जिल्ह्यात सध्या प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या निवारणासाठी 634 टँकर सुरू करण्यात आलेत. पण तरीही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टँकरने पाणी पुरवठा केला जातोय खरा पण लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
सध्या जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूक असल्यानं प्रशासकीय यंत्रणा निवडणुकिच्या कामात गुंतली आहेत. मात्र दुसरीकडे पाणीप्रश्न देखील गंभीर होत चाललाय. निवडणुकीच्या प्रचारात याच्यावर त्याच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जातात. पण पाण्याचा महत्वाचा मुद्दा निवडणुकीतून देखील गायब झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाई किती दिवस कायम राहणार हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.