अक्षय शिंदे
जालना : जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. दरम्यान पावसामुळे नदीला पूर आला असल्या कारणाने गावातील रस्ता आणि पूल पाण्यात बुडाला आहे. यामुळे आजारी मुलाला वेळेवर दवाखान्यात नेता न आल्यामुळे उपचाराअभावी तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील रुई तांड्यावरील सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत प्रथमेश पवार (वय ३) असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जालना जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचा मुसळधार पावसामुळे जीव गेला आहे. अशीच घटना अंबड तालुक्यात घडली असून प्रकृती खराब असताना उपचारासाठी नेता न आल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे.
आजीच्या खांद्यावर सोडले प्राण
अंबड तालुक्यातल्या रुई तांड्यावर दोन दिवसापासून सातत्याने पाऊस बरसत असून यामुळे गावाजवळील भद्रायणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे तांड्याबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पुरात बुडाल्याने या रस्त्यावरील रहदारी बंद झाली आहे. शिवाय ग्रामस्थांना देखील दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. यात आजारी असलेल्या या चिमुकल्याला दवाखान्यात नेता आले नाही. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने आजीच्या खांद्यावरच चिमुकल्याने प्राण सोडले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
४०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
गोदावरी नदीला काल रात्रीपासून पुर आल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. यात सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव येथील ४०० गावकऱ्यांना एनडीआरएफ पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने गावातून सुरक्षित स्थळी हलवले आहे. बोटीद्वारे या गावकऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.