Maratha bandh in Maharashtra on September 3 latest update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने संतापाची लाट पसरली आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी (३ सप्टेंबर) मराठा समाजाच्या वतीने जालना, बीड, परभणी आणि लातूर या ४ जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तोडगा न निघाल्यास धाराशिव जिल्हाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारने आजच ठोस तोडगा काढला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आणि आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. आज अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला आहे. संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिव, बीड, लातूरसह अनेक ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला. सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
काय बंद राहील:
चारही जिल्ह्यांतील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प राहतील.
व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यास सर्व किरकोळ व ठोक दुकाने बंद राहतील.
प्रमुख महामार्ग आणि शहरांमधील वाहतूक मराठा कार्यकर्त्यांकडून रोखली जाण्याची शक्यता आहे.
काय सुरू राहील (अत्यावश्यक सेवा):
सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने नियमित सुरू राहतील.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक संस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध पुरवठा, रुग्णवाहिका आणि इतर आणीबाणीच्या सेवा बंदमधून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यभरात आंदोलनाचा भडका; ठिकठिकाणी रस्ता रोको व उपोषणे
जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर मराठा बांधवांनी आक्रमक रस्ता रोको आंदोलन केले. पुलावर ठिय्या मांडून 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये गाडी सोडण्याच्या कारणावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली.
लातूर शहर आणि जिल्ह्यात मराठा समाज पूर्णपणे आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला आणि उद्याचा लातूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयासमोर जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बालाजी पाटील कदम बटाळकर या मराठा तरुणाने गेल्या ४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. "जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही," असा कठोर निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.