राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. पुढील 4 दिवस दक्षिण कोकणासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच सातारा, कोल्हापूर आणि पुण्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला आहे. तसंच ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. यामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात तुफान पाऊस झालाय. आकुर्डी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही घरात पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शहरात विविध भागात दुपारपासून पाऊस सुरू होता. अतिवृष्टीमुळे चिंचवड स्पाईन रोडवर गाड्या पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलंय. यामुळे शेताला शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झालंय. दरम्यान पेरणी झालेल्या शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. तर काही ठिकाणी पावसामुळे पेरण्या खोळबल्यात आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात आज दुपारनंतर तुफान पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुळगा ते बाकली, उजेड या मार्गावरील नवीन पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. येथील रेणापूर, अहमदपूर उदगीर, औसा भागात देखील पाऊस झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.