उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमानात मोठी घट
धुळे, परभणी, निफाड येथे ७ अंशांखाली तापमान
पुढील काही दिवसांत थंडी अधिक तीव्र होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
राज्यात उत्तरेकडील वारे वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक आहे. तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेसदृश स्थिती आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार होत, गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज तापमानात चढ उतार राहणार असून पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तापमानात होणाऱ्या सततच्या बदलावामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून नागरिकांना अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे.
राज्यात शनिवारी धुळे येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी येथे ६.४ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जेऊर येथे ९ अंशांपेक्षा कमी तापमानाची, तर पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशन वादळ श्रीलंकेच्या त्रिंकोमलीपासून ६० किलोमीटर ईशान्येकडे, जाफनापासून १४० किलोमीटर आग्नयेकडे, तर पद्दुचेरीच्या कराईकलपासून २५० किलोमीटर आणि चेन्नईपासून ४५० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात घोंघावत आहे. उत्तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत असलेलं हे वादळ वायव्येकडे सरकत आहे. ते आज दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.