हिंगोली : वाढत्या उन्हाच्या झळांमध्ये हिंगोली शहरातील पाणी टंचाईच्या झळा देखील तीव्र झाल्या आहेत. हिंगोली शहरात पालिकेच्या वतीने नागरिकांना नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होत नसल्याने शहरातील अनेक भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत आहे. तहान भागविण्यासाठी शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे तीव्र स्वरूपात पाणी टंचाई जाणवत आहे. राज्यातील अनेक भागात हि परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच हिंगोली शहरातील नागरिकांना देखील पाणीटंचाईची समस्या आता भेडसावत आहे. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
जलवाहिनीच्या तांत्रिक बिघाडाने पाणी समस्या
हिंगोली शहरात एकूण जवळपास २७ वार्ड आहेत. या वार्डमध्ये जवळपास ८५ हजार पेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. पालिकेच्या वतीने शहरात नळाद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी वीस हजारपेक्षा अधिक नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात असलेल्या सिद्धेश्वर धरणातून हिंगोली शहराला नियमित पाण्याचा पुरवठा होतो. मात्र मागील पंधरा दिवसापासून जलवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
ट्रॅकरची होतेय मागणी
अर्थात मागील पंधरा दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर झाला आहे. सध्या आठ दिवसांआड नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून यामध्ये देखील शहरातील काही भाग पाण्याविना वंचित आहे. तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर नागरीक दुचाकीवर पाण्याच्या कॅन घेऊन मिळेल; त्या ठिकाणाहून पाणी उपलब्ध करत आहेत. दरम्यान शहरात प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पाण्यासाठी भटकंती करणारे नागरिक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.