हिंगोली : मराठा आरक्षणासाठी मुंबई झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत शासन आदेश काढला आहे. मात्र या आदेशानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेला जीआर तातडीने रद्द करावा; अशी मागणी करत हिंगोलीत ओबीसी समाज बांधवांनी औंढा जिंतूर राज्यमार्ग रोखून धरत आंदोलन केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले. पाच दिवस चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटनुसार मराठा समाजाच्या मागण्या करत शासन आदेश काढला आहे. मात्र यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी ओबीसी समाजाकडून सरकारचा निषेध करत आंदोलन केले जात आहेत.
शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
हिंगोली जिल्ह्यातील औंढा- जिंतूर मार्ग रोखून धरत सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. येळी पाटी येथे हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव आंदोलनासाठी एकत्र जमले होते. दरम्यान सरकार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ओबीसी नेते चंद्रकांत लव्हाळे यांनी केला. तर कुणबी दाखल्याच्या आधारे ओबीसीमध्ये लाखो मराठा घुसखोरी करण्याची शक्यता असल्याने सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा; अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती.
बारामतीत ओबीसी मोर्चाची परवानगी नाकारली
बारामती : बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे. मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. दरम्यान गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला पुढील तारीख घ्या; अशी आंदोलकांना विनंती केल्याचे पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.