९ ते ११ सप्टेंबरदरम्यान २१ राज्यांत जोरदार पाऊस
काही भागांत ताशी ७० ते ७५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप
देशभरात मान्सूनचा जोर कायम असून अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान देशातील २१ राज्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या काळात काही भागांत ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. नागरिकांनी वादळी हवामानाच्या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
पावसाने उघडीप दिल्याने राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. त्यातच कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांच्या पुढे गेल्याने अनेक भागांत उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तुरळक पाऊस पडू शकतो. बहुतांश भागांत पावसापेक्षा उघडीप राहण्याची शक्यता असून, तापमान वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.