

दिवाळी संपली तरी देखील पाऊस जायचे नाव घेत नाहीये. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे सतत हवामानात बदल होत पाऊस पडत आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. आजपासून पुढचे ४ दिवस राज्यावर अवकाळीचे संकट कायम आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर विदर्भ वगळता राज्यभर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या मुंबई उपनगरासह ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे.
२५ ऑक्टोबरला नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूरया जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. २६ ऑक्टोबर रोजी मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. २७ ऑक्टोबर रोजी धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. २८ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेडमध्ये पावसाचा अंदाज आहे.
ठाणे शहरांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ठाणे शहरात दुपारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अचानक पडलेला पावसामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली. तर उल्हासनगर शहरात दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसामुळे बाजारपेठेत ग्राहकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले.
वसई- विरार शहरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस पडत असलेल्या वसई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ढगांच्या गडगडासह शहरात पाऊस पडत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
अकोल्यात आज दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात आजपासून पुढील ३ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून संपल्यानंतरही अकोला शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी आज दुपारी आणि काल रात्री पाऊस झाला. अकोल्यातल्या गुडधी, मोठी उमरी, जठारपेठ भागात ३० मिनिटे पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. २७ ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली होती. आज झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचं तोडणीवर आलेले सोयाबीन पीक धोक्यात आल्याचे चित्र आहे. पुढील ३ दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील ४ ते ५ दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून आजही पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे भात कापणी ठप्प झाली आहे. भातशेतीत पावसाचे पाणी गेल्याने शेतकऱ्यांना कापणी करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दिवाळीत भात कापणी ७० ते ८० टक्के पूर्ण झाली होती. यंदा मात्र पावसामुळे कापणी रखडली आहे. दरम्यान जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून काल रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.