गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी
रेल्वे आणि रस्ते मार्गांवर प्रवाशांचा ताण वाढला
कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या उशिराने
मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी, त्यामुळे खासगी वाहने आणि एसटी बस प्रवाशांना मोठा त्रास
सर्वत्र उद्या गनारायच आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणवासीय मुंबईहून गावाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरवर्षी हजारोंच्या संख्येने मुंबईतील नागरिक कोकणात जातात. यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जातात. मात्र तिकिटांअभावी कोकणवासीयांना रस्ते मार्ग अवलंबावा लागतो. अशातच अनेक राजकीय पक्ष नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फ्रीमध्ये ज्यादा एसटी बस सोडतात. या बस एकत्र गावाच्या दिशेने निघाल्याने रस्ते मार्गावर वाहतूक कोंडीत नागरिकांचं कंबरडं अक्षरशः मोडत. यंदा देखील अशीच परिस्थिती उद्भवली आहे. एकीकडे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून रेल्वे १२ तास उशिराने धावत आहे, तर रस्ते मार्गांवर ट्रॅफिकमुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत.
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 300 हून अधिक जादा फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मात्र, या वाढीव फेऱ्यांचा परिणाम नियमित रेल्वे सेवांवर झाल्याचे चित्र आहे. नियमित गाड्या साधारणपणे दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत, तर काही गणपती स्पेशल गाड्यांना तब्बल दहा ते बारा तासांचा विलंब होत आहे. याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
कोइंबतूर एक्सप्रेस तब्बल 12 तास उशिराने रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. तर कोकण कन्या एक्सप्रेस 3 तास 17 मिनिटे, तुतारी एक्सप्रेस 3 तास, जनशताब्दी एक्सप्रेस दीड तास, तर सावंतवाडी एक्सप्रेस तब्बल 6 तास उशिराने धावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विविध राजकीय पक्षांकडून मोफत एसटी बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या बस मोठ्या संख्येने एकाच वेळी कोकणाच्या दिशेने रवाना झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवरही मोठा ताण आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी बस आणि खासगी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली आहेत. त्यामुळे रेल्वेचा पर्याय निवडला तरी विलंब आणि रस्त्याने प्रवास केला तरी वाहतूक कोंडी, अशा दुहेरी कोंडीत गणेशभक्त सापडले आहेत. गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्याऐवजी रेल्वेचा लेटमार्क आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे अक्षरशः त्रासदायक ठरत आहे. उत्सवाच्या उत्साहात घराकडे निघालेल्या नागरिकांना प्रवासातील या अडचणींमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.