3 घराण्यांना कोकण आंदण? एकाच कुटुंबात आमदार-खासदार आणि मंत्रिपद,कोकणातही घराणेशाहीचा दबदबा

एकेकाळी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते आता स्वतःच घराणेशाहीचे नवे 'ब्रँड अ‍ॅम्बेसिडर' बनलेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांवर नजर टाकली तर संपूर्ण कोकण जणू काही तीनच राजकीय घराण्यांना आंदण दिलंय की काय, असा प्रश्न पडावा. कोकणातील नेत्यांनी घराणेशाहीचा दबदबा कसा निर्माण केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Political power in Konkan appears concentrated within a few influential families, raising concerns over growing dynastic dominance.
Political power in Konkan appears concentrated within a few influential families, raising concerns over growing dynastic dominance.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

घराणेशाही राज्यात नवी नाही..आणि याला आता कोकणही अपवाद राहिलेला नाही. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरलाय. आणि यात सत्ताधारी तिन्ही पक्षांचा समावेश आहे. घरात खासदारकी आणि मंत्रिपद असतानाही मुलाला आमदार करण्यासाठी वडिलांनी कंबर कसलीय. यामुळे आता कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे तीन जिल्हे प्रत्येकी एका घराण्यानं वाटून घेतल्याचं चित्र निर्माण झालंय. काहींच्या घरात आमदारकी- खासदारकी आणि मंत्रिपद आहे. तर काहींच्या कुटुंबात दोन-दोन आमदारक्या आहेत. सर्वात आधी पाहूयात रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्याचं राजकारणात नेहमीच राष्ट्रवादीच्या तटकरे कुटुंबीयांभोवती फिरत राहिलंय. सुनील तटकरे आमदार झाल्यानंतर पुढे मंत्री झाले आणि त्यांनी गेल्या चार दशकात आपली जिल्ह्यावरील मांड पक्की केली.

तटकरे खासदार झाल्यानंतर त्यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धनमधून 2019 साली आदिती तटकरेंना विधानसभेवर निवडून आणलं. मविआ सरकारमध्ये आदिती तटकरे राज्यमंत्री झाल्या. त्यानंतर महायुती सरकारमध्ये त्यांचं प्रमोशन झालं आणि त्या कॅबिनेट मंत्री झाल्या. इतकंच नव्हे तर रायगडमधून तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. ते निवडून आले तर एकाच घरात खासदार, मंत्री आणि आमदार असणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते उदय सामंतांनीही घराणेशाहीचा कित्ता गिरवलाय़. दोन पक्षांचा प्रवास केलेले उदय सामंत दोन दशकांपासून रत्नागिरीचे आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला भाऊ किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी मिळवून दिली आणि तेही आमदार झाले. आता एकाच घरात एक भाऊ मंत्री तर दुसरा आमदार आहे.

याला सिंधुदुर्ग जिल्हाही अपवाद नाही. मुळात सिंधुदुर्गमध्येच कोकणातील घराणेशाहीची मुहुर्तमेढ रोवली गोली. शिवसेना-काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या नारायण राणेंच्या घरात सगळी पदं आहेत. एकेकाळी संपूर्ण कोकणावर वर्चस्व असलेल्या नारायण राणेंनी मुख्यमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्रिपद भूषवल्यानंतर आता ते भाजपचे खासदार आहेत. तर त्यांचा लहान मुलगा नितेश राणे कॅबिनेट मंत्री आहेत. माजी खासदार असलेला मोठा मुलगा निलेश राणेंनी पुनर्वसनासाठी थेट पक्ष बदलला आणि ते शिंदेसेनेचे आमदार झाले. एकाच घरात आता मंत्री, खासदार आणि आमदार आहे

राजकीय नेते कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा पक्षांतर करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं वारंवार सांगत असतात. मात्र निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याची वेळ आली की आपल्याच कुटुंबीयांना प्राधान्य देतात हे काही आता लपून राहिलेले नाही. आणि एकेकाळी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे पक्षही आता याला अपवाद राहिलेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com