योगेश काशीद,साम टीव्ही
बीड: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल तीन महिने उलटले, तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप करत खळबळजनक खुलासा केला आहे.
धनंजय देशमुख यांनी सांगितले की फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे पोलिसांशी घनिष्ठ संबंध होते आणि त्याच्यासोबत त्याचं उठण-बसण होते, याचे पुरावे देखील समोर आले आहेत. तसेच कृष्णा आंधळे पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जर हे खरे असेल तर प्रशासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही ते म्हणाले.
या प्रकरणाचा तपास कितपत पुढे सरकला आहे, याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. तसेच वाल्मीक कराड यांच्या बी टीमला सहआरोपी का ठरवले जात नाही असा प्रश्न उपस्थित करत २५ फेब्रुवारी रोजी मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.या आंदोलनाला मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. दरम्यान राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता,मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा आहे की नाही घ्यायचा तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे.असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण असून आरोपी फरार असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता २५ फेब्रुवारीच्या आंदोलनानंतर सरकार व प्रशासन यावर काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.