Maharashtra Political News : नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरतात; काँग्रेस नेत्यांचा निशाणा
सचिन बनसोडे/ लक्ष्मण सोळुंके
Congress Leaders Slams PM Narendra Modi : राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाल्यानंतर काँग्रेसकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नेते बाळासाहेब थोरात यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. मोदी हे राहुल गांधींना घाबरतात असा टोला या दोन्ही नेत्यांनी लगावला आहे.
मोदी आडनावावरून दाखल मानहानीच्या खटल्यात शिक्षा सुनावल्यानं राहुल गांधींचे (Rahul Gandhi) लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं राहुल यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांना खासदारकी परत मिळाली आहे. पक्षाचे दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंतचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. त्यांच्यात उत्साह संचारला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींना खासदारकी परत मिळाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा देशासाठी आनंदाचा क्षण आहे. तानाशाही प्रवृत्तीविरोधात हा गांधींचा विजय आहे, असे ते म्हणाले.
मोदी हे राहुल गांधींना घाबरतात. राहुल गांधी यांची खासदारकी निकालानंतर पाच मिनिटांत रद्द केली. ती पुन्हा बहाल करायला ४८ तास लावले. यावरून मोदी हे राहुल गांधींना घाबरतात असे दिसून येते, असा टोलाही त्यांनी लगावला. इंडिया विरुद्ध एनडीएचा सर्वात जास्त त्रास भाजपला होतो, असा टोमणाही पटोले यांनी आशिष शेलार यांना मारला.
राहुल गांधींचा प्रामाणिकपणा देशाला पुढे नेणारा - थोरात
राहुल गांधींना खासदारकी परत मिळाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले. राहुल यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न झाला. तो अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीत त्याची नोंद काळ्या अक्षरांत होईल, असे थोरात म्हणाले.
राहुल यांना सरकारी निवासस्थानातून बाहेर काढलं ही लाजीरवाणी कृती आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला. भाजपला राहुल यांची भीती वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल यांचा प्रामाणिकपणा देशाला पुढे नेणारा असल्याचेही थोरात म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील हे भाजपसोबत जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेला स्वतः पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. थोरात यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील वेगळा निर्णय घेतील, असे वाटत नाही. ते शरद पवारांसोबतच राहतील अशी खात्री आहे, असे थोरात म्हणाले.
भाजपला इंडियाची धास्ती
इंडिया आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. पहिल्या दोन बैठका यशस्वी झाल्या. भाजपला इंडियाची धास्ती आहे, असंही थोरात म्हणाले. काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रम घेणार आहे. सध्या इंडियाच्या बैठकीची जबाबदारी आहे. मुंबईतील बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे राज्यभर दौरे आणि विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहितीही थोरात यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.