
नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
Devendra Fadnavis Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. पुण्यात सुरु असलेल्या जयपुर डायलॉग कार्यक्रमात फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना 'शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाविषयी शब्द दिला होता का?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस यांनी निवडणूक पूर्व आणि निवडणूक पश्चातचा घटनाक्रम सांगितला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनाक्रम सांगताना म्हणाले, 'मी, आदित्य आणि वहिनी (रश्मी ठाकरे) बाहेर बसलो होतो. उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्या भेटण्यासाठी आतमध्ये गेले होते. बाहेर आल्यानंतर पीसीमध्ये कोणी-काय बोलायचे ते ठरले. जसे ठरले होते तसे मी बोललो. आत मुख्यमंत्रीपदाबाबत काही बोलणे झाले असेल तर ते बाहेर आल्यानंतर माझ्याशी तसे बोलले असते.'
'आम्ही सरकार बनवू शकतो हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रंग बदलला. त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही. निकाल आल्यानंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेण्याऐवजी आधी एकट्याने पत्रकार परिषद घेतली आणि आम्हाला सगळे पर्याय खुले असल्याचे सांगितले. जर मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलं असेल, तर त्याची किमान चर्चा त्यांनी केली असती. शरद पवार यांच्यासोबत जायचं हे उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आधीच ठरले होते,' असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आरोप केले होते. यावरुनही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढतच असते. लोकसभा निवडणुकीत खूप लोकांची नावे यादीत नव्हती. आम्ही त्याचा पाठपुरावा केला तेव्हा निवडणूक आयोगाने मोहीम राबवली आणि मोठ्या संख्येने नवे मतदार समाविष्ट झाले. राहुल गांधी हे चेहऱ्यावरची धूळ साफ करण्याऐवजी आरसा साफ करत बसलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.