
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवई यांना संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं.
निमंत्रणानंतर आंबेडकरी समाजात झाली होती नाराजी व्यक्त
कमलताई गवई यांनी स्वतः पत्र लिहून कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय स्पष्ट घेतलाय.
प्रकृतीच्या कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केलं.
अमर घटारे, साम टीव्ही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवई यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, कमलताई गवई यांनी पत्रक काढून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे जाहीर केलं आहे. 'माझं वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही. त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमात मी जाणार नाही, असं कमलताई गवई यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवई या जाणार असल्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली होती. या पत्रकानंतर आंबेडकरी अनुयायांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काही दिवसांनंतर कमलताई गवई या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं हस्तलिखीत पत्र व्हायरल झालं होतं. त्यानंतर कमलताई गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनीही शताब्दी महोत्सवाचं निमंत्रण स्वीकारल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी पत्रक काढत कार्यक्रमाला जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
कमलताई गवई पत्रकात म्हटलं की, 'कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर सुद्धा टीकाच नव्हे तर दोषारोपण केलं. आम्ही देखील आंबेडकरी विचाराला वाहून घेतलंय. दादासाहेब गवई यांचं जीवन तर आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होतं. दुस-या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणेही गरजेचं असतं. त्यासाठी धाडस आणि सिंहाचं काळीज लागतं. दादासाहेब जाणूनबुजून अशा विरोधी मंचावर जायचे, तेथे वंचितांचे प्रशन मांडायचे, तो त्यांच्या धोरणाचा भाग होता. आपल्याशी असहमत असलेल्यांनाही ते आपली भूमिका ऐकवावी असे त्यांचे मत होतं. ते संघाच्या कार्यक्रमात गेले, पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्वीकारले नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वावरच भाषण केलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानिक विचारांची मांडणी केली'.
'आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार, ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा आपल्या संस्काराचा भाग आहे. तरीही माझ्यावर आणि स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर ज्या पद्धतीने वस्तुस्थितीला धरुन नसलेली टीका झाली. तसेच अजुनही होत आहे. माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहून घेतलंय. या एका कार्यक्रमामुळे ते कलंकीत करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथीत आणि दुःखी झाली आहे. माझे वय ८४ असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.