चंद्रपूर : पट्टेदार वाघांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत असताना महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. मागील चार महिन्यांत देशात ६२ वाघांचा मृत्यू झाला असून २० वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातील आहेत. परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. तर १७ वाघांच्या मृत्यूने मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात २०२२ या वर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार देशात ३ हजार १६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे. या गणनेत महाराष्ट्राचाही वाटा मोठा होता. राज्यात २०१८ मध्ये ३१२ वाघांची नोंद झाली होती. तर २०२२ मध्ये त्यात मोठी वाढ होत ती संख्या ४४४ वर पोहचली होती. पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र वाघांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी २०२५ पासून २६ एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत देशात ६२ वाघांचे मृत्यू झाले आहेत.
वाघांच्या शिकारीच्याही घटना
बहेलिया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील ५ वर्षात देशभरात तब्बल १०० हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यात दरवर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून वाघांचे अवयव भारतातील विविध भागातून पुरवले जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
मृत्यूची वेगवेगळी कारणे आली समोर
मृत्यू वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार तसेच नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक २० मृत्यू झाले आहेत. मागील पाच वर्षात वाघांच्या मृत्यूचा आकडा पाहिल्यास यंदा चार महिन्यात मृत वाघांचा आकडा मोठा आहे. तर मागील पाच वर्षांतील मृत्यूत २०२० मध्ये १०६ वाघांचा मृत्यू, २०२१ मध्ये १२७, २०२२ मध्ये १२१, २०२३ मध्ये १७८ आणि २०२४ या वर्षी १२४ वाघांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.