शुभम देशमुख
भंडारा : तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात १ हजार १५४ मामा तलावाची संख्या आहे. परंतू वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यातील मामा तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिक्रमण देखभाल दुरुस्तीचा अभाव यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. पुरेसा निधी मिळत नसल्याने स्थिती गंभीर आहे.
भंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. या तलावांमुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने तलावांची समस्या बिकट झाली आहे. अतिक्रमण व साठलेल्या गाळामुळे तसेच नादुरुस्त पाळ व लिकेज गेटमुळे अनेक तलावांची सिंचन क्षमता निम्म्यावर आली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
काही तलावांची सिंचन क्षमता वाढली
जलयुक्त शिवारामुळे काहीसे रुपडे पालटले आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील मामा तलावाचे खोलीकरण, पाळी बांधणे, कालव्यांची दुरुस्ती, गेट दुरुस्ती, पाट दुरुस्ती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने मागील तीन वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून मोठा निधी खर्च केला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. काही मामा तलावाचे रुपडे पालटून तलावांची सिंचन क्षमता वाढली. परंतू, अन्य तलाव अद्याप दुर्लक्षित आहेत.
अनेक गावात दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
यावर्षी जलयुक्त शिवार योजना टप्पा क्र. २ अंतर्गत जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली. त्यामुळे तलाव दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली. परंतु अद्याप अनेक तलाव दुरुस्तीसाठी निधीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे दुरुस्ती अभावी या तलावांची स्थिती दयनीय झाली असून हे तलाव अखेरच्या घटक मोजत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.