

नाशिकनंतर भंडाऱ्यात प्रशासनाकडून वृक्षतोड
प्रशासनाच्या कारभारवर निसर्गप्रेमी नाराज
वृक्षतोडीवरून निसर्गप्रेमी आणि स्थानिकांकडून चिंता
शुभम देशमुख, साम टीव्ही
प्रगती आणि विकासाच्या कामासाठी पर्यावरणाचा बळी देणं किती योग्य आहे? असा सवाल भंडाऱ्यातील नागरिक विचारत आहे. भंडाऱ्यातील मुजबी ते भंडारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपासून सावली देणाऱ्या महाकाय वृक्षांवर कुऱ्हाड पडणार असल्याचे समोर येत आहे. भंडाऱ्यातील शेकडो झाडे कापली जात असल्याने निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून चिंता व्यक्त होतेय.
भंडारा जिल्ह्यातील महामार्गावरील सर्व प्रकार आहे. 'चौपदरीकरणाच्या' नावाखाली वृक्षतोड केली जाणार असल्याचे समोर येत आहे. भंडाऱ्याच्या मुजबी ते भंडारा दरम्यानच्या ५ किलोमीटर अंतरावर अनेक कडुनिंब आणि इतर औषधी झाडे आहेत. १०० ते १५० वर्षांपासून सावली देणारे झाडे आता कायमची इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
शहरात पोटाची खळगी भरणारे छोटे व्यावसायिकही उघड्यावर येणार आहेत. झाडे कापल्याने चहाच्या टपऱ्या, फळविक्रेते, आणि कारागीरांच्या डोक्यावरची सावलीचे छत्र जाणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुसाट होईल. परंतु वृक्षतोडीमुळे रोजगाराचा प्रश्न आणि पर्यावरणाची हानी कशी भरून निघणार, असा सवाल भंडाऱ्याचे नागरिक उपस्थित करत आहेत.
आतापर्यंत भंडाऱ्यातील ८० ते ९० झाडे कापण्यात आले आहेत. जुना नागपूर नाका ते आरटीओ ऑफिस या भागातील ७० झाडे कुऱ्हाडीच्या प्रतीक्षेत आहेत. या ७० झाडांमध्ये शिसम, निलगिरी, पिंपळ आणि कडुनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. वृक्षतोडीच्या निर्णयावरून निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्ते न बांधता पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.