
सचिन बनसोडे, साम टीव्ही
संगमनेर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झाला. बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघाला भाजपने सुरुंग लावला. भाजपचे नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून जायंट किलर ठरले. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने महाराष्ट्र काँग्रेसलाही मोठा धक्का बसला. या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदा जाहीर मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये स्नेह मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो जणांनी उपस्थिती दर्शवली. या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मी इतक वर्ष काम केलं. पण कधी कोणाला त्रास दिला नाही. ब्लॅकमेल केलं नाही. तालुक्यात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पराभवानंतर अनेक जण वेगवेगळी कारण माझ्यावर समोर देत आहेत. काही जण ईव्हीएमवर शंका घेत आहेत.
माझ्या पराभवाचं परीक्षण देखील केलं आहे. सर्वांशी संवाद साधला आहे. काही जण लाडकी बहीण, तर कोणी जातीय तर कोणी आणखी कारणे सांगितली. सोशल मीडियात मला मुस्लिम धार्जिना देखील केलं गेलं. मी स्वत: हिंदू आहे.
मी राजकारणात कधीही जातीय भेदभाव केला नाही. ८५ सालच्या आधी दंगलीचं शहर म्हणून संगमनेरला ओळखला जायचं. मात्र मी आमदार झाल्यानंतर कधीही घडलं नाही. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलो. दंगलीचे शहर ही प्रतिमा पुसली. मग विरोधकांना हे दिसत नाही.
माझी मुस्लिम धार्जिणा म्हणून प्रतिमा बनवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मात्र मी गणपतीची आरती केली सप्ताहाला देखील गेलो आणि सगळे समाजाला घेऊन पुढे चाललो. हे दिसलं नाही.
माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केवळ राजकारणासाठी केला जात आहे. काही बाहेरच्या मंडळींचा संगमनेर तालुक्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न आहे. प्रवरा कारखान्याने आपलं तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं. आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील.
नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिम्मत झाली आहे. नवीन झालेला आमदार हे त्यांचं हत्यार आहे. मग काही मंडळी मला म्हणत होती, तुम्ही तिकडे कशाला गेले. मात्र त्यांना मंत्री केल्यावर त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.
अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मग माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हा अन्याय सहन करू शकत नाही. त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे. काही झालं तरी राहणार आहे.
आम्हाला त्रास झाला तर मी लढणारच. आम्ही कोणताही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणारे नाही. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे हा पराभव झाला हे लक्षात ठेवा. मी तुमच्या भरोशावर राज्यात फिरलो. आता सगळं दुरुस्त करायच आहे. मी तिकडे चांगलं करायला जातो.
आपलं राजकारणाचा फाउंडेशन एकदम पक्क आहे. यावेळी थोडासा हलल्याने ते कमकुवत होणार नाही. तुमची साथ द्या. मी आता प्रत्येक गावात जाणार आहे. गावागावातील गट तट थांबवले पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.