
रणजीत माजगांवकर, पनवेल | साम प्रतिनिधी
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज, शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयानं ऐकून घेतला. तसेच बिद्रे यांच्या कुटुंबीयांची बाजू न्यायाधीशांनी जाणून घेतली. आरोपींच्या शिक्षेचा निकाल राखून ठेवला आहे. २१ एप्रिलला यावर निकाल दिला जाणार आहे. सुनावणीनंतर बिद्रे यांची मुलगी सिद्धी हिनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणामुळं सहा ते सात वर्षे भीतीच्या आणि तणावाखाली असलेल्या सिद्धीनं माध्यमांसमोर येऊन आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. माझ्या आईला या लोकांनी अत्यंत क्रूरपणे मारलं, असं सांगत असतानाच, सिद्धी अचानक थांबली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
पनवेल न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सिद्धीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. न्यायालयात सुनावणीदरम्यान काय घडलं, याबाबत तिनं माहिती दिली. न्यायाधीशांनी मला मत मांडायला सांगितलं. या प्रकरणाचा सर्वात जास्त कुणावर परिणाम झाला असेल तर तो माझ्यावर, असं त्यांना वाटतं. मी माझं म्हणणं त्यांच्यासमोर माडलं. ही प्रक्रिया खूप लांबली. यामुळं माझे वडील, कुटुंबीय आणि मामांचे खूप हाल झाले. कारण दर शुक्रवारी त्यांना यावं लागायचं. या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा. पुन्हा सगळी कामं करून घ्यायची. कुणीही मदत करायला तयार नव्हतं. प्रत्येक जण आरोपीला मदत करण्यासाठी प्रयत्न करत होते. तरीही माझे वडील, कुटुंबीयांनी सगळे प्रयत्न केले, असे ती म्हणाली.
माझ्या आईला बघून पोलीस अधिकारी व्हायचं असं स्वप्न होतं. पण ही घटना घडली. त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. ही सिस्टम आणि पोलीस मनातून उतरले. आता या खटल्याला एवढा वेळ गेला आहे. असो, पण आता थोडा विश्वास वाढला आहे. कुठेतरी चांगले लोकही आहेत, असा विश्वास आहे. प्रशासकीय सेवेत राहून ही सिस्टम बदलता येणार आहे, असंही सिद्धी म्हणाली. आरोपींकडून नुकसान भरपाई मिळण्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेऊन काय करणार आहे. माझी आई तर परत मिळणार नाही. तिची उणीव भरून निघणार नाही. पैशांचं मोल नाही, माणसाचं मोल आहे, असं ती म्हणाली.
ही घटना आणि त्यानंतरच्या प्रक्रियेमुळं सहा-सात वर्षांत काय काय त्रास सहन करावा लागला, याबाबतही सिद्धीनं सांगितलं. या काळात आईची आठवण कुणी भासू दिली नाही. पण ती आठवतेच ना! भीती असायची की माझ्या वडिलांना काही होणार तर नाही ना? ही सहा-सात वर्षे खूप टेन्शनमध्ये गेली. कारण या प्रकरणातील सगळे पोलीस आरोपींच्या बाजूने होते. त्यामुळे पप्पांना काही होईल अशी भीती होती.
माझी एकच विनंती आहे की या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, असं सिद्धी म्हणाली.
या खटल्याच्या सुनावणीत काय झालं, याबाबतची माहिती वकिलांनी दिली. मागील सुनावणीतच आरोपी क्रमांक एकला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं. तर इतर आरोपींना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. अश्विनी बिद्रे यांची कन्या, पती, वडील जयकुमार आणि बंधू या चौघांचं म्हणणं न्यायालयानं ऐकून घेतलं. आतापर्यंतचा वेळ गेला, त्यात आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाले. आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. तर आरोपीच्या वकिलांनी दया दाखवावी, असं न्यायालयाला सांगून ही केस फाशीच्या शिक्षेच्या परीक्षेत्रात आणू नये. जन्मठेप द्यावी, असा युक्तिवाद केला, असे वकिलांनी सांगितले.
आज न्यायाधीशांनी सांगितलं की, ज्या गोष्टी माझ्यासमोर आल्या आहेत, त्यांचा सर्वंकष विचार करायला वेळ हवा आहे. तौलनिक अभ्यास करून निष्कर्षापर्यंत येईल आणि माझा निर्णय मी २१ तारखेला जाहीर करेल, अशी माहितीही वकिलांनी दिली. या प्रकरणात हलगर्जीपणाचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिसांवर कारवाई होईल का याबाबत विचारणा केली असता, या प्रकरणात जे पोलीस अधिकारी होते, त्यांनी या प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहेत असा निष्कर्ष निघाला आहे. या प्रकरणात त्वरित पुरावे मिळाले असते. पण ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. एखादा संवेदनशील खटला नोंदवला जातो, त्यावेळी या यंत्रणेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीचं तपासावर लक्ष असायला हवं. संबंधित अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला हवं, असंही वकिलांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.