आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रायगडात सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू

राज्यात असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, घटक पक्ष शेकापतर्फे कार्यकर्ता मेळावे पक्षाच्या नेत्यांकडून होऊ लागले आहेत.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रायगडात सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रायगडात सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरूSaam TV
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड: आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Muncipal Corporation Election) निवडणुकीच्या अनुषंगाने रायगडात सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, घटक पक्ष शेकापतर्फे कार्यकर्ता मेळावे पक्षाच्या नेत्यांकडून होऊ लागले आहेत. जिल्ह्यात भाजप पक्षांकडूनही थोडया प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात आघाडी सरकार असले तरी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी बाबत अजून स्पष्ट संकेत नसले तरी वरिष्ठांच्या आदेशाने जिल्ह्यात निवडणुका लढल्या जातील असे नेत्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने युवकांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष हा जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणीला लागला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार हे मतदार ठरवणार आहेत.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रायगडात सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू
शेकडो उड्डाणे रद्द, शाळा बंद, अनेक भागात लॉकडाऊन; अचानक का बंद झाला चीन?

रायगड जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत आणि मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसात सुरू होणार आहे. रायगडात सर्वच पक्षाचा शत्रू हा शेकाप आहे. मात्र शेकाप हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. रायगड जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस याची सत्ता आहे. तर काँग्रेसने पाठींबा दिला आहे. शिवसेना ही विरोधी बाकावर आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे चित्र पालटले असून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ही एकत्रित आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर अपक्ष 1 असे विधानसभेचे आमदार आहेत. खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडी पक्ष हे एकत्रित येणार की स्वतंत्र लढणार याबाबत कोणताही सूतोवाच देण्यात आलेला नाही.

जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाची ताकद वाढलेली आहे. एकेकाळी जिल्ह्यात ताकद असलेले काँग्रेस आणि शेकाप हे काहीसे पिछाडीवर पडले आहेत. भाजप ही जिल्ह्यात आपले पाय रोवू लागला आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेकाप आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत आणि शिवसेनेचे तिन्ही आमदार यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते हे कार्यकर्ते मेळावे घेऊन तरूणाईला आकर्षित करीत आहेत. आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी प्रत्येक पक्ष हा तयारीला लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी भक्कम असली तरी स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांमध्ये कुरखोडी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडी, युती झाली किंवा नाही झाली तरी आपला पक्ष जिल्ह्यात एक नंबर कसा राहील यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com