त्यांच्या पक्षात जाताच ते धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ : पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

सातारा : त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय, काय माहीत ? त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात असला की त्याची चाैकशी लागते अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा उल्लेख टाळत केली. ajit-pawar-wai-bjp-satara-latest-news-sml80

वाई येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, नगराध्यक्ष अनिल सावंत आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
'महाविकास'च्या राज्यमंत्र्यास आत्मविश्वास; 'आम्हीच जिंकणार'

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले यापुर्वी बऱ्याच जणांची चाैकशी लागलेली. ते तिकडे गेले आणि काहींना आमदार की मिळाली, काहींना मंत्रिपद मिळालं, त्यांच्यावर लागलेल्या चाैकशा बंद झाल्या. हे चाललेले राजकारण न समजण्या इतकी आमची जनता दूधखुळी नाही. जनता सूज्ञ आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

दरम्यान श्री.पवार म्हणाले, वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावेश करण्याबाबत विनंती करण्यात येईल.

Ajit Pawar
पुणे, नाशिकच्या सुरक्षिततेसाठी लाॅकडाउनचा निर्णय : अजित पवार

शहरांचा विकास करताना ती स्वच्छ आणि नीटनेटकी असायला हवी. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीने होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार व्हावे. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबर पर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा, येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असेही श्री.पवार यांनी नमूद केले.

नगर परिषदेचे व्यापारी संकुल शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध देणारे ठरावे असेही त्यांनी नमूद केले. कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानव जातीवर कोविडचे संकट आले असताना नागरिकांचा जीव वाचविण्याला या योद्ध्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने मानवसेवेचे कार्य केले.

आमदार मकरंद पाटील यांच्यासारख्यांचा सन्मान केल्याने काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यास कुठलीही कमतरता भासू देणार नाही असेही श्री.पवार यांनी नमूद केले.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार मकरंद पाटील यांनी कोरोना काळात सेवा भावनेने कार्य केले असे सांगितले. कृष्णा नदीवरील पुलामुळे वाईसाठी चांगली सुविधा होईल. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणावर भर देणे अवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, बाहेरील जिल्ह्यातील नागरिक वाई येथे येतात. ही सांस्कृतिक नगरी असल्याने पुलाचे बांधकाम करताना त्याचे जुने सौंदर्य कायम ठेवण्यात येत आहे. मुलांसाठी शाळेच्या चांगल्या इमारती उभ्या राहणार आहेत. कोविड काळात आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. मात्र आता जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या माध्यमातून विकासाला वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com