Ajit Pawar Death: विमानात बिघाड की हवामान खराब, नेमकी गडबड कुठे झाली? अपघातानंतर विमान कंपनीच्या मालकाची प्रतिक्रिया आली समोर
विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय.
लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
बारामतीत येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केलीय. फॉरेन्सिक टीम आजच घटनास्थळावरून नमुने गोळा केली आहेत. याचदरम्यान अपघातग्रस्त झालेल्या चार्टर विमानाच्या मालकाने अपघाताबाबत मोठं विधान केलंय. अपघातावेळी नेमकी कोणती गडबड झाली असावी याची माहिती दिलीय.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी ते सकाळी मुंबईहून बारामतीला निघाले. बारामतीच्या विमानतळावर लँडिंग होतानाच विमानाला अपघात झाला. या अपघाताबाबत विमान कंपनीचे मालकाने प्रतिक्रिया दिलीय. अपघात कशामुळे झाला याची माहिती दिलीय.
अपघातग्रस्त झालेले विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation) या खासगी कंपनीचे होते. कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी अपघातानंतर मीडियाशी बोलून प्राथमिक माहिती दिली. दरम्यान अपघात विमानातील बिघाडामुळे झाला असावा असं म्हटलं जात आहे. त्यावरून बोलताना विजय कुमार सिंह म्हणाले, कंपनीकडून विमानाची नियमित आणि उत्तम देखभाल केली जात होती.
विमानात कोणताही तांत्रिक दोष किंवा बिघाड नव्हता. अपघात पूर्णपणे वैमानिकांच्या निर्णयामुळे झाला असावा असं त्यांनी यावेळी सांगितलं. पायलटनं आधी रनवे २९ वर उतरण्याचा प्रयत्न केला पण काही अडचण आल्याने रनवे ११ वर दुसरा प्रयत्न केला आणि त्यावेळी हा अपघात घडला. दृश्यता कमी असल्याने वैमानिकांना रनवे नीट दिसला नसेल असेही ते म्हणाले.
पायलटबद्दल ते म्हणाले, "माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही, ते तिथे नाहीत. पायलटचा लँडिंगचा निर्णय खूप दुर्दैवी होता. आम्हालाही या अपघाताचे खूप दुःख आहे." "आम्ही त्यांच्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत आहोत, ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे."
अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटबाबत बोलताना विजय कुमार सिंह म्हणाले, मला शंका आहे की, पायलटला धावपट्टी दिसलं नसावं. कारण तो एक अनुभवी पायलट होता, त्याच्याकडे १६,००० तासांपेक्षा जास्त तास उड्डाण करण्याचा अनुभव होता. "सह-वैमानिकालाही १,५०० तासांचा अनुभव होता. दोन्ही पायलट खूप अनुभवी होता. त्याने यापूर्वी सहारा, जेटलाईट आणि जेट एअरवेज सारख्या कंपन्यांसाठी काम केले होते आणि त्याला या प्रकारच्या विमानांचा बराच अनुभव होता."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

