हिंगोली: ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे आपण अभिमानाने म्हणतो. मात्र आजही ग्रामीण भागात अनेक मुलींना शिक्षण अर्धवट सोडून कमी वयातच लग्नाच्या बंधनात अडकवले जाते. अशाच परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील एका १५ वर्षीय विद्यार्थिनीने दाखवलेले धाडस सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीने आपल्या होणाऱ्या बालविवाहाला आळा घालण्यासाठी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून मदतीची आर्त विनंती केली. मला शिकायचं आहे. घरच्यांनी माझं लग्न २५ वर्षीय तरुणासोबत ठरवलं आहे. मला आत्ताच लग्न करायचं नाही. माझं लग्न थांबवा असा भावनिक मजकूर या पत्रात तिने लिहिला होता.
या पत्राची गंभीर दखल घेत मुख्याध्यापकांनी तत्काळ ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर बाल संरक्षण समिती व महिला व बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले.
सध्या ही मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत असून तिच्या सराव परीक्षा सुरू आहेत. प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी गावागावात जनजागृती करण्यात येत असून, त्याचाच परिणाम म्हणून या मुलीने आपल्या शिक्षणासाठी आवाज उठवण्याचे धाडस केल्याचे चित्र दिसून येते.
मुख्याध्यापकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा होणारा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आता ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीकडून जिल्हा बालकल्याण समितीकडे पाठवण्यात येणार आहे. ही घटना म्हणजे शिक्षणाची गोडी लागलेल्या एका मुलीने दाखवलेले धैर्य आणि प्रशासनाच्या तत्परतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.